ठाणे : बीड जिल्ह्यातील एका मशिदीमध्ये स्फोट घडविण्यात आला, या प्रकरणात दोन तरूणांना पोलिसांनी अटकही केली आहे. आपल्या लक्षात येते की नाही, हे माहित नाही. पण, महाराष्ट्राचे रूपांतर आता धर्मद्वेषाच्या प्रयोगशाळेत केले जात आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांवर व्यक्त केली आहे.

गुजरात, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशात अशीच प्रयोगशाळा उघडून तिचा प्रयोग करण्यात आलेला आहे. आता महाराष्ट्र निशाण्यावर आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. महाराष्ट्रातील संतपरंपरा, महाराष्ट्राचे पुरोगामित्व आणि महाराष्ट्राचे देशातील वेगळेपण उद्ध्वस्त करण्याचा हा कट आहे. कारण महाराष्ट्राने द्वेषाला कधीच स्थान दिले नाही, त्याचे सर्वात मोठे उदाहरण हे मुंबई आहे. कारण, मुंबईची माती ज्याने ज्याने आपल्या कपाळी लावली तो कधीच उपाशी झोपला नाही. हीच महाराष्ट्राच्या मातीची ओळख आहे, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात जात, धर्म, पंथ, प्रांत हे बाजूला सारून लोकांनी एकमेकांसाठी जीव दिले आहेत. पण, आता जे काही घडतंय त्याची महाराष्ट्राला कधी ओळखच नव्हती. ही नवीन ओळख निर्माण केली जात आहे, महाराष्ट्राने त्यापासून सावध रहायला हवे, असेही त्यांनी म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार का?

आता प्रश्न उरतो त्या स्फोटाचा. हा स्फोट ज्यांनी घडवून आणला त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार का? कारण, दोन समाजात द्वेष निर्माण करणे, हे देशहिताचे नाहीच. त्यामुळे हे देशविघातक कृत्य आहे, हे आपण मान्य करायला हवे. मंदिरात स्फोट घडवणारा आणि मशिदीत स्फोट घडवणारा हे दोघेही या देशाचे शत्रूच आहेत. पण, महाराष्ट्रात वाढत चाललेला जातीय विद्वेष धार्मिक विद्वेष महाराष्ट्राच्या हिताचा नक्कीच नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.