अंबरनाथ : कल्याण-बदलापूर मार्गावरील आयुध निर्माणीसमोरील परिसरात असलेल्या एका नामांकित कंपनीच्या दुचाकी शोरूमला मंगळवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत शोरूममधील ५० हून अधिक दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. दुकान मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या घटनेत कोणतीही जिवितहानी झालेली नाही.
दुचाकीचे शोरूम कल्याण-बदलापूर मार्गावर आयुध निर्माणीच्या समोर आहे. शोरूमच्या तळ आणि पहिल्या मजल्यावर विक्रीसाठी अनेक नवीन दुचाकी ठेवण्यात आल्या होत्या. मंगळवारी रात्री शोरूम बंद करण्यात आल्यानंतर, पहाटे साधारण तीन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. शोरूममधील सुरक्षा रक्षकाने तातडीने अंबरनाथ अग्निशमन दलाशी संपर्क साधला. अग्निशमन दलाचे पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले, परंतु आगीच्या तीव्रतेमुळे अंबरनाथ अग्निशमन दलासह आयुध निर्माणी, आनंद नगर एमआयडीसी आणि उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन पथकांनाही पाचारण करण्यात आले.
अंबरनाथ अग्निशमन दलाचे प्रमुख भागवत सोनोने यांनी सांगितले की, सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. रात्रीची वेळ असल्याने शोरूममध्ये कोणीही उपस्थित नव्हते, त्यामुळे जीवितहानी टळली. मात्र, या आगीत शोरूममधील ५० हून अधिक दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. यामुळे शोरूम मालकाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन दल आणि संबंधित यंत्रणा याबाबत तपास करत असून, पुढील माहिती लवकरच समोर येईल, असे सोनोने यांनी नमूद केले.