ठाणे : ठाणे- बोरिवली मार्गावरील बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकर परिसराच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रेय रहिवाशांचे असून हा लढा रहिवाशांनी जिंकला असे म्हस्के म्हणाले.

ठाणे- बोरिवली बोगदा प्रकल्पाचे काम सध्या मानपाडा येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी सुरु आहे. या कामामुळे पाच इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना वाहतूक कोंडी, धूळ आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत होता. रहिवाशांनी येथील कामाला विरोध आंदोलन केले होते. काही दिवसांपूर्वीच खासदार नरेश म्हस्के, रहिवासी आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अधिकाऱ्यांसमवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नावर सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक घेतली होती.

बैठकीत मुल्लाबाग रहिवासी संघाच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांची अडचण समजून घेण्यात आली. त्यानंतर त्यांच्या मागणीनुसार हा बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकर परिसराच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या मार्गावर सध्या वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषणाचा त्रास कमी करण्यासाठी राडारोडा आच्छादित करून त्यानंतर तो वाहून नेण्याचा निर्णय घेण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या निर्णयानंतर येथील रहिवाशांनी म्हस्के यांच्या आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. खासदार नरेश म्हस्के यांनी हे श्रेय आमचे नसून जनतेच्या रेट्याचे असल्याचे सांगत हा लढा येथील रहिवाशी जिंकले आहेत. आम्ही सदैव रहिवाशांसोबत असल्याची ग्वाही खासदार नरेश म्हस्के यांनी दिली.