लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : भिवंडी पश्चिम मतदारसंघात महाविकास आघाडीने काँग्रेसचे दयानंत चोरघे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. असे असतानाही महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे उमेदवार रियाज आझमी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे याठिकाणी काँग्रेस आणि समाजवादी पक्षामध्ये मैत्रिपूर्ण लढत होणार आहे. मंगळवारी रात्री राष्ट्रवादीचे (शरद पवार) खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) हे समाजवादीच्या व्यासपीठावर आल्याने चर्चांना उधाण आले आहे. मी कोणाला हरविण्यासाठी नाही तर, रियाज यांना निवडून आणण्यासाठी येथे आलो आहे अशी स्पष्टोक्ती देखील बाळ्या मामा यांनी दिली.

भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीत काँग्रेस आणि समाजवादी पक्षामध्ये खलबते उडाली होती. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघापैकी काँग्रेसला मिरा भाईंदर आणि भिवंडी पश्चिम या दोन जागांवरच समाधान मानावे लागले आहे. भिवंडी शहरामध्ये काँग्रेसची मोठी ताकद आहे. असे असतानाही भिवंडी पूर्वची जागा समाजवादी पक्षाने लढविण्यास यश मिळविले आहे. या मतदारसंघात रईस शेख हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. तर भिवंडी पश्चिम येथे काँग्रेसने महाविकास आघाडीने काँग्रेसचे दयानंद चोरघे यांना उमेदवारी दिली होती. येथून समाजवादी पक्षाने देखील रियाज आझमी यांना उमेदवारी दिली. महाविकास आघाडीने ही जागा काँग्रेसला सोडल्यानंतरही रियाज यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे येथे मैत्रिपूर्ण लढत होणार आहे. या दोन्ही उमेदवारांसमोर भाजपचे विद्यमान आमदार महेश चौघुले यांचे आव्हान आहे.

आणखी वाचा-ठाणे जिल्ह्याच्या निवडणुक रिंगणात जुनेच चेहरे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादीला (शरद पवार गट) भिवंडी मतदारसंघ सुटल्याने त्याची सल काँग्रेसमध्ये होती. येथील काँग्रेसच्या नेत्यांनी याविषयी नाराजी देखील व्यक्त केली होती. परंतु बाळ्या मामा यांनी निवडणूक लढवित येथून भाजपच्या कपिल पाटील यांचा पराभव केला होता. विधानसभा निवडणूकीत भिवंडी पश्चिम येथून दयानंद चोरघे यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर बाळ्या मामा हे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल कराताना मिरवणूकीत देखील सहभागी झाले होते. परंतु मंगळवारी अचानक ते समाजवादी पक्षाच्या व्यासपीठावर गेले. रियाज यांनी लोकसभा निवडणूकीत बाळ्या मामा यांना मदत केली होती. त्यामुळे त्यांनी आग्रह केल्यानंतर बाळ्या मामा त्यांच्या व्यासपीठावर गेले होते असा दावा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. बाळ्या मामा यांनी या व्यासपीठावर भाषण करत मी कोणाला हरविण्यासाठी नाही तर रियाज यांना जिंकविण्यासाठी आल्याची स्पष्टोक्ती त्यांनी केली.