ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातील सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी मुलभूत सोयीसुविधा देण्यात मध्ये रेल्वे प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप करत शिवसेना (शिंदे गट) खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांची बुधवारी भेट घेऊन त्यांना विकासकामे तातडीने पुर्ण करण्याची मागणी केली. तसेच ही कामे पुर्ण झाली नाहीतर, जनआंदोलन करू असा इशाराही म्हस्के यांनी त्यांना दिला आहे.
मध्य रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांची खासदार नरेश म्हस्के यांनी बुधवारी भेट घेतली. यावेळी रेल्वे उपमहाव्यवस्थापक के. के. मिश्रा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक हरीश मीना, एस. एस. गुप्ता आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आरएलडीएच्या माध्यमातून ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास लवकरात लवकर होणे अपेक्षित आहे. ठाणे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी सविस्तर प्रकल्प अहवालातील मुख्य आराखड्यानुसार, ९५० कोटी रुपयांचा प्रस्ताव २६ मे २०२३ रोजी रेल्वे प्राधिकरणाने पाठविला आहे. या विकासकामासाठी नियमित पाठपुरावा करत आहे. मात्र अद्याप पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू झालेली नाही. मुख्य आराखडा पाठवून सुद्धा दोन वर्षांहून अधिक काळ लोटला तरी काम सुरु झालेले नाही, असे सांगत खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली.
रेल्वे विभागाला सुचना
ठाणे ते मुंबई (सीएसएमटी) कडे जाणाऱ्या फलाटावर अजून एक पादचारी पूल बांधणे आवश्यक आहे. हा पादचारी पूल फलाट क्रमांक १ ते फलाट क्रमांक ७ आणि ८ नंबरला पूर्व आणि पश्चिम असा जोडला जाईल. ते काम तातडीने सुरु करावे. ठाणे रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक ५ ते फलाट क्रमांक १० ला जोडणाऱ्या पादचारी पूलाच्या पुनर्बांधणीचे काम अपूर्ण असून ते तात्काळ मार्गी लावावे. वर्तकनगर येथील आरक्षण केंद्रात एक शौचालय बांधावे. केंद्रात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरक्षण केंद्राचे नूतनीकरण करावे. नव्याने वायरिंग, खिडक्या दुरुस्ती, रंगरंगोटी, बैठक व्यवस्था इत्यादी कामे त्वरित पूर्ण करुन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत केली.
सिडको आणि मध्य रेल्वे समन्वय साधणार
सिडको प्रशासनाने नवी मुंबईमधील रेल्वे स्थानकांची निर्मिती केली आहे, तर रेल्वे प्रवासी सेवा मध्य रेल्वे देत आहे. या दोन्ही प्राधिकरणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने कित्येक वर्ष येथील रेल्वे स्थानकांची सुधारणाच झालेली नाही. स्थानकांतील दुर्दशेमुळे प्रवाशांना नाहक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. या गंभीर प्रश्नाकडे आजवर कोणाचेच लक्ष गेले नव्हते ही दुर्दैवाची बाब आहे, अशी नाराजीही खासदार म्हस्के यांनी व्यक्त केली. दरम्यान, बैठकीत रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मिना आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याशी दुरध्वनीद्वारे खासदार नरेश म्हस्के यांनी संभाषण करून देत चर्चा केली. येथील प्रवासी माझ्याकडे सोयीसुविधा देण्यासाठी वारंवार संपर्क करत आहेत. मात्र दोन्ही प्राधिकरणात समन्वय नसल्याने प्रवासी त्रस्त आहेत. यावर मार्ग न निघाल्यास कायदा हातात घेऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा म्हस्के यांनी दिला. यावर दोन्ही अधिकाऱ्यांनी या आठवड्यात संयुक्त बैठक घेऊन प्रवाशांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
स्थानकांतील सोयी सुविधांबाबत सूचना
मध्य रेल्वे, मुंबई विभागाने दिघा ते ठाणे स्थानका दरम्यानच्या ट्रकच्या अप-डाऊन लाईनवरील वर आणि खाली जाणाऱ्या जुळ्या भुयारी मार्गांसाठी प्रस्ताव पाठवला आहे. हा भुयारी मार्ग नसल्यामुळे नागरिकांना रेल्वे रुळ ओलांडावा लागत असून यामुळे अपघात होत असल्याची बाब म्हस्के यांनी महाव्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून दिली. दिघा रेल्वे स्थानकात छत, पंखे, दिवे आणि ध्वनिक्षेपकाची दुरुस्ती, रेल्वे स्टेशन बाहेर ब्लॉक बसविणे, तसेच दिघा, ऐरोली आणि कोपरखैरणे या स्थानकांवर एस्कलेटरची सुविधा, ऐरोली स्थानकावर आरक्षण खिडकी सुरू करणे, रबाळे पश्चिम कडील तिकीट खिडकी रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवणे, सानपाडा-जुईनगर रेल्वे पुलाचे काम पुन्हा सुरू करावी. वाशी ते बेलापूर, तुर्भे ते ऐरोली आणि बामनडोंगरी ते खारकोपर या सर्व रेल्वे स्थानकांवरील रेल्वे फलाट, रेल्वे कार्यालयांच्या आजूबाजूचा परिसराची सुधारणा करावी, अशी सुचनाही त्यांनी केली.