ठाणे : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आणि पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांना खरमरीत पत्र पाठविले आहे. त्यात तुम्ही मुंब्य्राचे वाटोळे करीत आसल्याचा गंभीर आरोप आव्हाड यांनी दोन्ही आयुक्तांवर केल्याने खळबळ उडाली आहे. तुम्ही दोघे जबाबदार आहात, तुमच्या लक्षात आले पाहिजे कि, एक शहर आपण राजकारणापोटी बर्बाद करीत आहोत. या शहराचे भविष्य बर्बाद करीत आहोत. कोणीतरी तुम्हाला विचारणारा असेलच आज नाहीतर उद्या, असेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा >>> ठाणे: राज्यात महाविकास आघाडीच्या दोनशे जागा येतील; राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा दावा
मुंब्रा परिसराचे आपण वाटोळे करायला घेतले असल्याचे दिसून येते. पोलीस आयुक्त असो नाहीतर महापालिका आयुक्त असो आपण मुंब्रा पूर्णपणे अमली पदार्थाच्या (ड्रग्ज) जाळ्यात अडकवत चालले आहात. गेली १४ वर्षे जे आम्ही दाबून ठेवले होते. पोलीस अधिकारीही आम्हाला सहकार्य करायचे. अमली पदार्थाचा व्यवहार जवळ-जवळ बंद करण्यात आला होता. आता अमली पदार्थामधून देखील हफ्ते घ्यायला सुरुवात झाली आहे, असा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला आहे. अनधिकृत बांधकाम लक्की कंपाऊंड दुर्घटनेनंतर जवळ-जवळ बंद झाले होते. आपल्या काही अधिकाऱ्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षेपोटी आता एकेका गल्लीत २०-२० बांधकामे सुरू आहेत. मुंब्रा जेव्हा मी हातात घेतले, तेव्हा पाणी, वीज आणि रस्ते अशा तिन्हीचा त्रास होता. या तिन्ही गोष्टींवर मात करुन मुंब्रा शहर हे नावारुपाला आणले. सध्या इतक्या अनधिकृत इमारती उभारल्या जात असून त्या आपल्या निदर्शनास आणून दिल्या जात आहेत. परंतु आपण त्यावर कुठलीही कारवाई करताना दिसत नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.
हेही वाचा >>> कल्याण: बदली आदेश नसताना उप अभियंत्याचे कडोंमपा नगररचना विभागात चार वर्षापासून बस्तान
मी विरोधी पक्षातील आमदार असून मी सरकारवर टिका करतो. म्हणून या शहराचे आपण वाटोळे करणार का ? शहराची आजची परिस्थिती बघता गल्ली बोळांमध्ये अमली पदार्थ विकले जात असून त्याचबरोबर अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. बांधकामाच्या ठिकाणी रिव्हॉल्वहर काढली जात आहे. मारामारीच्या घटना घडत आहेत. आता मी हे लिहीतोय याबद्दल पोलीस आणि महापालिका कर्मचाऱ्यांनाही राग येणार. पण, शेवटी हे शहर जसे होते, तसे आता राहिलेले नाही. हे शहर बदलले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. अनधिकृत इमारती उभारल्या जात असतील तर पाणी टंचाई उद्भवणार. ती कशी हाताळायची. रस्ते खोदले जातात, ते कसे सांभाळायचे. मलनिसारणाची समस्या निर्माण होते. रस्त्यावर पसरलेली घाण आणि कचरा याकडे कोणीही लक्ष देत नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.
मुंब्रा ताब्यात घेणारा तो कोण ?
एकेकाळी पूर्णपणे भकास झालेला मुंब्रा नावारुपाला आला. एक काळ होता कि, १५०० ते १७०० रुपये चौरस फुट या भावाने घरे विकली जायची. आज ६००० रुपये चौरस फुट भावाने घरे विकली जातात. हा बदल इथे पायाभूत सुविधा आल्यामुळेच झाला. जोपर्यंत प्रशासन आणि मी हातात हात घालून शहरावर नियंत्रण ठेवत होतो. तोपर्यंत कोणीही अमली पदार्थ विकण्याची आणि बेकायदा इमारती उभारण्याची हिम्मत करीत नव्हते. आता हे कोणामुळे होत आहे, हे माहित नाही. पण, प्रशासन माझ्यापासून दहा फूट लांब झालेले आहे. यामध्ये नुकसान माझे नाही, नुकसान मुंब्र्याच आहे. उघड्या डोळ्याने मुंब्र्यातील सुज्ञ नागरीक बघत आहेत कि, जितेंद्र आव्हाड यांच्यावर अन्याय केला जात आहेत. त्यांच्यावर खोटे गुन्हे टाकून त्यांना जेलचा रस्ता दाखवत आहेत आणि इथे सगळे आपल्या ताब्यात घेत आहेत. हा ताब्यात घेणारा कोण आहे, हे पण जनतेला माहित आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.