कल्याणमध्ये तुम्ही बिनधास्तपणे सिग्नल मोडून गाडी चालवत असाल तर सावधान. कारण सिग्नल मोडणाऱ्या वाहन चालकांवर उद्यापासून (२२ फेब्रुवारी) ई-चलानद्वारे दंड आकारणी केली जाणार आहे. कल्याण शहर वाहतूक पोलीस उद्यापासून कल्याणमधील ५ प्रमुख चौकांमध्ये ही ई-चलन यंत्रणा कार्यरत करणार असल्याची माहिती  वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

कल्याण डोंबिवलीमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत साधारणपणे वर्षभरापासून प्रमूख चौकांमध्ये ट्राफिक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या सिग्नलवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. मात्र, कोविडमुळे सिग्नल मोडून जाणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली जात नव्हती. त्यानंतरही सिग्नलनुसार वाहने चालवणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय अशी असली तरी वाहतूक पोलिसांची कारवाई होत नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे सिग्नल मोडणाऱ्या वाहनांची संख्याही वाढत चालली होती. त्याला आळा घालण्याच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे.

कल्याणातील आधारवाडी चौक, खडकपाडा चौक, संदीप हॉटेल, प्रेम ऑटो आणि कल्याण पूर्वेतील आनंद दिघे चौकात सिग्नल मोडणाऱ्या किंवा सिग्नल लाईन क्रॉस करणाऱ्या वाहन चालकांवर ई चलानद्वारे दंड आकारणी केली जाणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

हेही वाचा : कार, दुचाकी चालवत असाल तर सावधान; गेल्या २३ महिन्यात वाहतूक नियम मोडणाऱ्यांना…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिल्यांदा ५०० रुपये, तर त्यानंतर दुसऱ्यांदा सिग्नल मोडल्यास किंवा लाईन क्रॉस केल्यास १ हजार ५०० रुपये दंड आकारणी केली जाणार आहे. हा दंड भरावा लागू नये म्हणून वाहन चालकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहनही कल्याण शहर वाहतूक शाखेने केले आहे. कल्याण डोंबिवली वाहतूक विभागाचे एसीपी मंदार धर्माधिकारी यांनी याबाबत माहिती दिली.