भिवंडी येथील दाभाड भागातील एका आश्रम शाळेमधील ज्योत्स्ना सांबर (९) हिला उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाल्याने मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ज्योत्स्नाच्या मृत्यूनंतर आणखी १६ विद्यार्थ्यांना अशाच प्रकारचा त्रास जाणवला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास का झाला याची माहिती अद्याप कळू शकली नाही. परंतु अन्नातून किंवा पाण्यातून त्यांना विषबाधा झाली असावी असा अंदाज डॉक्टरांकडून वर्तविला जात आहे. घटनेनंतर आरोग्य केंद्रातील डॉक्टर तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने आश्रमशाळेतील अन्नाचे आणि पाणाचे नमुने गोळा केले आहेत. दाभाड येथील शिरोळे गावात एक आश्रम आहे. सुमारे ३०० विद्यार्थी या आश्रमशाळेत राहतात. बुधवारी रात्री आश्रमातील ज्योत्स्ना हिला अचानक उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. आश्रम शाळेतील शिक्षकांनी तिला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला डॉक्टरांनी तात्काळ भिवंडी येथील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गुरूवार, शुक्रवार आणि शनिवारी आणखी १६ विद्यार्थ्यांना अशाचप्रकारचा त्रास झाला. त्यांना ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. यातील सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या घटनेनंतर दाभाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या पथकाने आश्रम शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची तपासणी सुरू केली आहे. तर अन्न व औषध प्रशासनाने येथील अन्नाचे आणि पाण्याचे नमुने गोळा केले आहेत. विषबाधेतून हा प्रकार झाला असावा असा अंदाज डॉक्टरांकडून वर्तविला जात आहे.