वसईत केवळ ४० टक्केच मीठ उत्पादन; दर्जा घसरल्याने मागणीतही घट एकेकाळी मीठ उत्पादनात आघाडीवर असलेल्या वसईतील मीठ व्यवसायाला आता अखेरची घरघर लागली आहे. वसईतील मिठागरे तर आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. समुद्राच्या उधाणाचे पाणी कमी येत असल्याने ४० टक्केच मीठ उत्पादन होत आहे, त्याशिवाय दूषित पाण्यामुळे वसईतील मिठाची मागणी घटली आहे. त्यामुळे आता मीठ पिकवणाऱ्या मजुरांच्या रोजीरोटीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालघर जिल्ह्य़ातील किनारपट्टीचा ग्रामीण भाग मिठागरांसाठी ओळखला जातो. वसईत आजही पेशवेकालीन मिठागरे असून, शेती व मासेमारीप्रमाणे पारंपरिक मिठागरांचा व्यावसाय सांभाळणारे अनेक जण आहेत. पालघर जिल्ह्यतील वसई-डहाणू या पट्टय़ात १५ हजार एकर जागेवर मिठाचे उत्पादन होते. यातील निम्मी जागा राज्य सरकारची, तर निम्मी जागा ही केंद्र सरकारच्या मालकीची आहे. वसईतले स्थानिक भूमिपुत्र या ठिकाणी मिठाचे उत्पन्न घेऊन आपली उपजीविका करत असतात. पाच हजार कुटुंबे या व्यवसायावर आपली उपजीविका करत असतात. वसई-विरारमधल्या १७०० एकर जागेवर मीठ उत्पादन घेतले जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून तोटय़ात चालणाऱ्या या उद्योगाला उतरती कळा लागली आहे. दूषित पाण्याचा परिणाम इमारतींचे सांडपाणी तसेच नाल्यातील सांडपाणी थेट खाडीत सोडले जात आहे. वसई तालुक्यात वालीव, पेल्हार या भागात शेकडो छोटे कारखाने आहेत. पालघर तालुक्यात तारापूर एमआयडीसी व पालघर औद्योगिक वसाहतीत सुमारे १६०० लहान-मोठय़ा रासायनिक कंपन्या आहेत. या कंपन्यांतून निघणारे रासायनिक सांडपाणी थेट समुद्रात सोडले जाते. त्यामुळे किनाऱ्यावरील पाणी प्रदूषित झाले आहे. प्रदूषित पाणी वापरल्यास मिठाचा दर्जा घसरत असल्याने अपेक्षित उत्पन्न घटू लागले आहे. या कारणास्तव एकापाठोपाठ एक आगारे बंद पडू लागले असून भविष्यात ते नष्ट होतील असे राज्य मीठ उत्पादक संघाचे अध्यक्ष मदन किणी यांनी सांगितले. गुजरातच्या मिठाला मागणी दूषित पाण्यामुळे मीठ उत्पादन कमी झालेले असतानाच गुजरातमधील मिठाला मागणी वाढली आहे. दीड कोटी टन मीठ हे गुजरात राज्यातून तयार होते. वसईच्या मीठ उत्पादकांना एक किलो मीठ उत्पादन करण्यासाठी १.४० रुपये खर्च होतो. परंतु त्यांना १.१० रुपयांनी मीठ विकावे लागते. हेच मीठ नंतर बाजारात १६ ते १८ रुपये किलोने विकले जाते. एक टन मीठ उत्पादन करण्यास १४०० रुपये खर्च येतो. व्यापाऱ्यांना हेच मीठ १२०० रुपयांना विकावे लागते. उत्पादन बंद असताना वेगळा जोडधंदा मिठाचे उत्पादन हे नोव्हेंबर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या महिन्यांमध्येच घेतले जाते. पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात मिठाची विक्री झाल्यानंतर पुन्हा मिठाचे उत्पादन घेण्यास सुरुवात होते; परंतु पावसाळ्यात आणि त्याआधी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी मीठ कामगार शेतीची कामे, खाडीकिनारी मासेमारी असे विविध जोडधंदे करतात. पावसाळय़ात मीठ कामगार शेतीची कामे करतात, असे मदन किणी यांनी सांगितले.