बदलापूर : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात उभारण्यात येणाऱ्या पोशीर आणि शिलार धरणांमुळे ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीला येणाऱ्या पुरावरही नियंत्रण मिळवण्यात फायदा होऊ शकतो. सोमवारी बदलापुरात पूरस्थिती उद्भवली. उल्हास नदी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचली. या काळात फक्त मोजक्या ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. ज्या ठिकाणी हा पाऊस झाला ते सर्व क्षेत्र प्रस्तावित पोशीर आणि शिलार धरणांचे क्षेत्र आहे. उल्हास नदीच्या पोशीर आणि चिल्हार या उपनद्यांमध्ये होत असलेल्या पावसाचे पाणी रोखण्यात यामुळे यश येणार आहे. त्याचा फायदा वांगणीपासून बदलापूर, कल्याण ग्रामीण आणि थेट उल्हासनगरपर्यंत होईल.

रायगड आणि ठाणे जिल्ह्यात विभागलेले उल्हास खोरे हे कोकण विभागातील तसे महत्वाचे खोरे आहे. मात्र या खोऱ्यात पडणारा पाऊस या भागात पुरस्थिती निर्माण करतो. या खोऱ्यात पुरेशी धरणे बांधली गेली नसल्याने या पावसाच्या पाण्याचा शेती वगळता अधिकचा फायदा होत नाही. उल्हास खोऱ्यात सरासरी ५ हजार मिलीमीटर पाऊस पडतो. यात कमी अधिक प्रमाण झाले तरी पावसाची सरासरी साडे चार हजार ते सहा हजार मिलमीटर इतकी असते, अशी माहिती कोकण हवामान अभ्यासक अभिजीत मोडक देतात.

उल्हास नदीला येऊन मिळणाऱ्या नद्यांमध्ये चिल्हार आणि पोशीर या नद्यांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षात उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर या तालुक्यांतील शहरे आणि गावांना मोठा फटका बसला. यात बदलापूर हे सर्वाधिक लोकवस्तीच्या शहरालाही पुराचा दरवर्षी फटका बसतो. विशेष म्हणजे अनेकदा अंबरनाथ तालुक्यात किंवा बदलापूर शहर आणि आसपासच्या भागात पाऊस नसताना देखील बदलापूर शहरात पूरस्थिती निर्माण होते. सोमवारीही अशीच काहीशी स्थिती निर्माण झाली. अंबरनात तालुक्यात सरासरी १५० मिलीमीटर पाऊस पडला. मात्र त्याचवेळी उल्हास नदीच्या उपनद्या असलेल्या पोशीर आणि चिल्हार नद्यांच्या क्षेत्रात असलेल्या नेरळजवळच्या कळंब, कुरूंग, किकवी आणि आसपासच्या परिसरात सरासरी ३०० मिलीमीटर पाऊस पडला. त्यामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली.

याच चिल्हार आणि पोशीर नद्यांवर आता राज्य सरकराने अनुक्रमे शिलार आणि पोशीर ही धरणे प्रस्तावित केली आहेत. पोशीर धरणाची क्षमता १२.३४ टीएमसी तर शिलार धरणाची क्षमता ६.६१ टीएमसी इतकी असणार आहे. त्यामुळे किमान इतकी क्षमतेचे पावसाचे पाणी उल्हास नदीत थेट येण्यापासून रोखण्यात यश येईल. त्यामुळे या धरणांची उभारणी झाल्यास उल्हास नदीकिनारी पुरस्थितीचा सामना करणाऱ्या शहरे आणि गावांना ५० टक्क्यांहून अधिक दिलासा मिळेल अशी आशा हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी व्यक्त केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रतिक्रिया : आम्ही अनेक वर्षांपासून ही मागणी करत होतो. यापुढे धरणांची उभारणी फक्त पाण्यासाठी नाही तर पुरापासून वाचण्यासाठीही करावी लागणार आहे. पुरस्थितीपासून वाचण्यासाठी बदलापुरला शिलार आणि पोशीरचा थेट फायदा होणार आहे. नद्यांचा गाळ काढल्यास त्याचा आणखी उपयोग होईल. नद्यांना भिंती बांधल्यास थेट पाणी शहरात शिरणार नाही. त्याचीही मागणी आम्ही केली आहे. राम पातकर, माजी नगराध्यक्ष, कुळगाव बदलापूर नगरपालिका.