ठाणे : ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसामुळे धरणातील जलसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. तसेच ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत असून सोमवारी पावसाचा जोर वाढला. असे असतानाही ठाणे महापालिका क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणारा पाणी पुरवठा गुरुवारी दुरुस्ती कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे या भागातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २७ लाख इतकी आहे. शहरासाठी प्रतिदिन ६२१ दशलक्षलीटर इतक्या पाण्याची गरज आहे. परंतु शहराला प्रत्यक्षात दररोज ५९० दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ९० दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे हे चारही स्त्रोत महत्वाचे मानले जातात. वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. यावर मात करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने मुंबई महापालिकेकडे २० दशलक्षलीटर वाढीव पाणी देण्याची मागणी केली आहे.

या दिवशी पाणी नाही

ठाणे महापालिका क्षेत्रात पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल दुरूस्तीचे अत्यंत महत्वाचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ठाणे शहराला होणारा १३५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा गुरूवार, २१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते शुक्रवार, २२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेपर्यत बंद राहणार आहे. यामुळे ठाण्यातील काही भागांचा पाणी पुरवठा २४ तासांसाठी बंद राहणार आहे.

या भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार

ठाणे महानगरपालिका अंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ व ३१ चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये तसेच वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. २, नेहरुनगर, मानपाडा प्रभागसमितीअंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा २४ तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे पालिकेने कळविले आहे. पाणीकपातीच्या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीने करुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.