ठाणे : ठाण्यातील गावदेवी मैदान येथे २० ते २२ जानेवारीदरम्यान रामायण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सृजन संपदाच्या माध्यमातून माजी खासदार डॉ. विनय सहस्राबुद्धे आणि प्रदेश भाजप प्रवक्ते सुजय पतकी यांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. २० जानेवारीला या महोत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून रामाच्या जीवनप्रवासावर आधारित रांगोळ्या या महोत्सवाचे विशेष आकर्षण असणार आहे.

अयोध्यामध्ये २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन आणि मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. या सोहळ्यानिमित्ताने ठाणेकरांसाठी रामायण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाची माहिती देण्यासाठी गुरुवारी डॉ. सहस्राबुद्धे आणि पतकी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या महोत्सवात ५०० वर्षांचा मंदिराचा प्रवास चित्र प्रदर्शनीच्या माध्यमातून दाखविण्यात येणार आहे. तसेच कारसेवक हुतात्मा स्तंभ उभारला जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांची श्रीराम जीवनातील विविध प्रसंगांवर चित्रकला स्पर्धा होणार आहे, अशी माहिती या वेळी देण्यात आली.

हेही वाचा >>>ठाण्यात उद्या दिवसभर अवजड वाहनांना बंदी

२० जानेवारीला डॉ. शंकर अभ्यंकर यांचे राष्ट्रनिर्माते प्रभू श्रीराम या विषयावर व्याख्यान होणार आहे. २१ जानेवारीला संगीत दिग्दर्शक कमलेश भडकमकर यांनी रचलेला ‘राम गाईन आवडी’ हा गीतसंध्या कार्यक्रम होईल. तर २२ जानेवारीला ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेले आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेले, गायलेले गीत रामायण श्रीधर फडके सादर करतील. हे तिन्ही कार्यक्रम सायंकाळी ६.३० वाजता होतील. तर दररोज सायंकाळी सामूहिक रामरक्षा पठण होणार आहे. २२ जानेवारीला सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत अयोध्या येथील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, असे डॉ. सहस्राबुद्धे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महोत्सवात रांगोळ्या प्रदर्शन होणार असून या रांगोळ्यांतून राम जीवनप्रवास उलगडला जाणार आहे. विशेष म्हणजे, यातील काही रांगोळ्या एआय तंत्रज्ञानाचा वापर करून साकारल्या जातील असे पतकी म्हणाले.