ठाणे – येथील लोकमान्यनगर टिएमटी बस आगारा समोरील रस्ता काँक्रीट करण्याचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. या कामामुळे यशोधननगर हून लोकमान्यनगर कडे जाणारा रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. परिणामी, टीएमटी बस गाड्या लोकमान्य आगारातून इंदिरानगमार्गे वळविण्यात आल्या आहेत. याचा फटका यशोधन आणि सावरकर नगरच्या रहिवाश्यांना बसत आहे. त्यांना बस पकडण्यासाठी पायपीट करत लोकमान्य आगार किंवा कामगार बस थांबा गाठावा लागत आहे.

ठाणे येथील लोकमान्यनगर भागात टिएमटीचा आगार आहे. या आगारा समोरील रस्त्यावरून टिएमटी तसेच इतर वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. हा रस्ता डांबरी होता. या डांबरी रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे काम महापालिकेने दोन महिन्यांपुर्वी हाती घेतले. या रस्ते कामासाठी खोदकाम करण्यात आले. परंतू, गेल्या दोन महिन्यांपासून रस्त्याखालील मलवाहिन्या आणि चेंबर उभारणीचे काम सुरू असल्यामुळे रस्ते कामास सुरुवात झाली नव्हती. या कामांसाठी हा रस्ता बंद असून या मार्गावरील वाहतूक आगारातून वळविण्यात आली होती. यामुळे आगारातील बस वाहतूकीस इतर वाहतूकीमुळे अडथळा निर्माण होत होता. परंतु, आता या कामामुळे यशोधनहून लोकमान्यनगरकडे जाणारा रस्ता यशोधन बस थांब्याजवळ मार्गरोधक अडथळे लावून बंद ठेवण्यात आला आहे. परिणामी, लोकमान्य आगारातून टीएमटी बस गाड्या इंदिरानगर मार्गे सोडल्या जात आहेत. परंतु, यशोधन नगर, सावरकर नगर भागात टीएमटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील मोठी आहे. शनिवारी अचानकपणे बस थांब्यावर बराचवेळ गाडी आली नसल्यामुळे प्रवाशांमध्ये धांदल उडाल्याचे चित्र होते. काहीवेळानंतर प्रवाशांना समजले की, रस्ता बंद केल्यामुळे बस गाड्या लोकमान्यनगरहून इंदिरानगरमार्गे पुढे जात आहेत. त्यावेळी यशोधन नगरच्या प्रवाशांनी लोकमान्य आगाराची आणि सावरकर नगरच्या प्रवाशांनी कामगार बस थांब्याची वाट धरली. परंतु, रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार, किती दिवस बस पकडण्यासाठी ही पायपीट करावी लागणार असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. तसेच लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करा अशी मागणी देखील नागरिकांकडून जोर धरु लागली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डवलेनगर रहिवाशांमध्ये संताप…

डवलेनगर परिसर हा लोकमान्यनगर आगाराच्या शेजारी आहे. या परिसराच्या मुख्य चौकातच रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे या परिसरातील नागरिकांची कोंडी झाली आहे. या परिसरात असलेला रिक्षा थांबा येथून हटविला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना लोकमान्यनगर बाजारपेठेला वळसा घालून यशोधन नगर परिसरात यावे लागत आहे. यामध्ये प्रचंड दमछाक होत असल्याची प्रतिक्रिया एका रहिवाशांने दिली. या भागात काही आपत्कालीन समस्या उद्भावली तर, रुग्णवाहिका किंवा अग्निशमन वाहन हे यशोधन नगर मार्गे पटकन परिसरात दाखल होत. परंतु, आता रस्ता बंद असल्यामुळे मोठी वाहन परिसरात दाखल कशी होतील असा प्रश्न परिसरातील प्रीतम शेवाळे यांनी उपस्थित केला आहे.