कल्याण – गुरुवारी रात्री पाकिस्तानची लष्करी विमाने, ड्रोन भारताकडून नेस्ताबूत करण्यात आली. याविषयीच्या बातम्या, काही दूरचित्रवाहिन्यांवर कल्याण, डोंबिवलीतील नागरिक गुरुवारी मध्यरात्री उशिरापर्यंत पाहत होते. याचवेळी कल्याण पश्चिमेत आधारवाडी भागात आकाशात तीन ड्रोन फिरत असल्याची अफवा पसरली आणि काही वेळ नागरिकांमध्ये घबराट पसरली.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरुवारी रात्री जोरदार हवाई हल्ले सुरू होते. दूरचित्रवाहिन्यांवरून हे थेट प्रक्षेपण पाहत असताना धडकी भरविणारे येणारे भोंग्यांचे आवाज. त्यानंतर हवेतल्या हवेत भारताकडून पाकिस्तानची क्षेपणास्त्रे, ड्रोन नष्ट करण्याची चपळाई. उत्तर भारतात युध्दामुळे बंद करण्यात आलेला वीज पुरवठा. ही सगळी दृश्ये नागरिक पाहत होते. याचवेळी कल्याणमधील काही नागरिकांना कल्याण मधील आधारवाडी भागात आकाशात तीन ड्रोन फिरत असल्याची जाणीव झाली.

कल्याणमध्ये दोन दिवसापूर्वी युध्दसरावाचे प्रशिक्षण जिल्हा आपत्कालीन विभागातर्फे करण्यात आले. यावेळी युध्दाच्या परिस्थितीत नागरिकांनी कोणती काळजी घ्यायची याविषयी माहिती प्रात्यक्षिकांद्वारे देण्यात आली होती. दरम्यान, कल्याण शहरातील आधारवाडी भागात रात्री १२ ते १२.३० वाजेदरम्यान तीन ड्रोन सदृश्य काही हालचाली आकाशात होत असल्याचे समजले. या हालचाली पाहत असताना नागरिकांमध्ये काही वेळ घबराट पसरली होती.

अनेक कुटुंबे घराबाहेर येऊन आकाशातील या हालचाली आपल्या नजरेने टिपत होते. हे ड्रोन कल्याण शहरावर काही संशयित हालचाली करत असल्याचे वाटल्याने जागरूक नागरिकांनी तातडीने पोलिसांच्या सेवा संपर्क क्रमांकावर संपर्क साधला. बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ही माहिती मिळाल्याने अधिकारी आणि गस्ती पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांना यासंदर्भातची माहिती देण्यात आली. पोलिसांनी बारकाईने अवलोकन केले. त्यावेळी ती नियमित विमान होती. एक विमान कमी उंचीवरून जात होते. तर, दोन विमाने आपल्या नियत मार्गाने इच्छित स्थळी चालली होती, असे निदर्शनास आले. हे ड्रोन नसून ती विमाने असल्याचे समजल्यावर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. नागरिकांना आपल्या आसपास, शहरात काही संशयास्पद हालचाली आढळून आल्या तर त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.