कल्याण – बुधवारी रात्रीपासून आणि गुरूवारी दिवसभर उल्हास खोऱ्यात मुसळधार पाऊस पडत आहे. उल्हास खोऱ्यातील पाणी उल्हास, काळू नदीत वाहून येत आहे. या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. काळू नदीवरील टिटवाळा भागातील रुंदे, फळेगावकडे जाणारा उड्डाण पूल गुरूवारी संध्याकाळी पाण्याखाली गेला.

काळू नदीवरील रूंदे पूल नदी स्तरापासून कमी उंचीवर असल्याने हा पूल मुसळधार पाऊस सुरू झाला की दरवर्षी पाण्याखाली जातो. त्यामुळे टिटवाळाकडून रूंदे, फळेगाव, खडवली परिसरातील दहा गाव परिसरात जाणाऱ्या नागरिकांचा संपर्क तुटतो. या दहा गाव परिसरातील नागरिक दररोज सकाळपासून ते रात्री पर्यंत रूंदे पुलावरून प्रवास करतात.

गुरूवारी दुपारनंतर काळू नदीच्या पाण्यात वाढ होत गेली. संध्याकाळी रूंदे पूल पाण्याखाली गेला. दहा गाव परिसरातून टिटवाळा, कल्याण भागात शाळांमध्ये येणारे विद्यार्थी, नोकरदार वर्गाला यामुळे वळसा घेऊन पर्यायी रस्ते मार्गाने आपल्या गावात जावे लागणार आहे. काळू नदीवरील रूंदे पूल पाण्याखाली गेला की संंपर्क तुटलेल्या फळेगाव परिसरातील नागरिक खडवली, उतणे गाव हद्दीतील पर्यायी रस्ते मार्गाचा अवलंब करतात.

काळू नदीची टिटवाळा भागातील रूंदे पूल भागातील धोका पातळी १०३.५० मीटर आहे. इशारा पातळी १०२ मीटर आहे. गुरूवारी दुपारपर्यंत काळू नदी टिटवाळा येथे १०२ म्हणजे इशाऱ्या पातळीवरून धावत होती. त्यामुळे रूंदे पूल पाण्याखाली गेला आहे. मुसळधार पावसामुळे काळू नदीच्या पाण्याची पातळी वाढेल आणि रुंदे पूल पाण्याखाली जाण्याच्या शक्यतेने गुरूवारी फळेगाव परिसरातून टिटवाळा भागात शाळेत आलेल्या मुलांना दुपारीच घरी सोडण्यात आले, असे काही शाळा चालकांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टिटवाळा, कल्याण भागात काही कामानिमित्त आलेल्या काही नागरिकांनी काळू नदीवरील पूल पाण्याखाली जाण्याच्या भीतीने लवकरच घरी जाणे पसंत केले. रात्री घरी परतणाऱ्या नागरिकांचे मात्र हाल होणार आहेत. पावसाने विश्रांती घेतली तर मध्यरात्रीपर्यंत पाणी ओसरेल अन्यथा शुक्रवारी सकाळीपर्यंत पाणी ओसरण्याची वाट पाहावी लागेल, असे स्थानिकांनी सांगितले