डोंबिवलीतील ‘ग’ प्रभाग क्षेत्रातील मल उदंचन केंद्रामधील पंप गेले सहा महिने बंद असल्याने गटारातील सांडपाणी रस्त्यावरून वाहू लागले आहे. यामुळे या परिसरात मोठय़ा प्रमाणावर दरुगधी पसरली असून, नागरिकांना मोठय़ा प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.
महानगरपालिकेच्या ‘ग’ प्रभागातील मल उदंचन व मलप्रक्रिया केंद्रातील दोन पंप कायमचे बंद आहेत. याशिवाय अन्य तीन पंप गेले सहा महिने बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे गटारातील सांडपाणी रस्त्यावरून वाहू लागले आहे. जवळच असलेल्या नाना-नानी पार्कमध्ये ज्येष्ठ नागरिकांना या दरुगधीमुळे उद्यानात प्रवेश करणेही जिकिरीचे ठरले आहे. या परिसरातील दिनेश निवास, गंगा निवास या इमारतीमधील रहिवाशांना गेल्या काही दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत असून, येथील रहिवासी सांडपाण्याशी संबंध जोडू लागले आहेत.
काही इमारतींमध्ये दरुगधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी असून यामुळे रहिवाशांना उलटय़ा, जुलाबाचा त्रास झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांकडे केल्या आहेत. अधिकारी पाहणीसाठी येतात, मात्र हे पंप अद्याप दुरुस्त झाले नसून आम्हाला दरुगधीचा सामना सतत करावा लागतो, अशा रहिवाशांच्या तक्रारी आहेत. पावसाळ्यात ही परिस्थिती आणखी बिकट होईल त्याआधी या पंपांच्या दुरुस्तीचे काम झाले पाहिजे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

रहिवाशांच्या तक्रारींना केराची टोपली
महापालिका अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही प्रशासकीय यंत्रणा त्याकडे फारसे लक्ष देत नसल्याचा आरोपही स्थानिक नगरसेवक वसंत भगत यांनी केला. योगीराज कंपनीचे कंत्राट दीड वर्षांपूर्वीच संपले असल्याने तेही त्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. हे पंप तत्काळ दुरुस्त व्हावे यासाठी निवेदन दिले आहे. उदंचन केंद्राची देखभाल दुरुस्तीचे काम योगीराज पॉवर टेक  कंपनीकडे दिले असून या कंपनीचे राजेश विचारे याविषयी म्हणाले, पंप हाऊसच्या बांधकामाची दुरुस्ती सुरू असल्याने तीन पंप काही दिवस बंद होते. यंत्रणा नादुरुस्त झाल्या असून नवीन मशीन बसविणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.