अंबरनाथ : अतिरिक्त भाडे मिळवण्याच्या हेतून प्रवाशांच्या जीवांशी खेळ करत अनेक चालक रिक्षा दामटवित असतात. मात्र अशा रिक्षाचालकांविरूद्ध कारवाई करण्यासाठी अंबरनाथ पोलिसांनी कंबर कसली आहे. मंगळवारी सायंकाळी अंबरनाथ पूर्वेतील लोकनगरी नाल्याजवळ शिवाजीनगर पोलिसांनी सापळा रचत चौथा प्रवासी बसवणाऱ्या रिक्षाचालकांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल केले. अचानक झालेल्या या कारवाईनंतर रिक्षाचालकांमध्ये तातडीने संदेश पोहोचला. त्यानंतर अंबरनाथच्या आनंदनगर औद्योगिक वसाहत ते अंबरनाथ स्थानक रस्त्यावर लगेचच रिक्षाचालकांनी चौथ्या प्रवाशाला उतरवले.
गेल्या काही वर्षात रिक्षा प्रवासी भाडे सातत्याने वाढते आहे. परिवहन विभागाच्या आदेशांना हरताळ फासत रिक्षाचालक अनेकदा भाडेवाढ रेटून नेतात. करोनाच्या संकटात रिक्षात दोनच प्रवासी बसवण्याची मुभा होती. त्यामुळे त्याकाळात प्रवाशांकडून अतिरिक्त भाडे आकारण्यास सुरूवात करण्यात आली. पुढे दोन प्रवाशांची जागा तीन प्रवाशांनी घेतली. अनेकदा तर चौथा प्रवासीही जबरदस्तीने बसवला जातो. मात्र भाडे वाढीवच राहिले. त्यामुळे प्रवाशांना रिक्षात दाटीवाटीने बसूनही तितकेच भाडे द्यावे लागते.
अनेकदा प्रवासी मिळवणाच्या नादात चौथा प्रवासी रिक्षात चालकाच्या शेजारी बसवला जातो. वेळेत रेल्वे स्थानक किंवा इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी प्रवासी तडजोड करतात. जे प्रवासी याला विरोध करतात, त्यांना दाद दिली जात नाही. सर्वच रिक्षाचालक चौथी सीट घेतल्याशिवाय प्रवास सुरू करत नाहीत. अन्य प्रवासीही विरोध करणाऱ्या चौथ्या सीटवरच्या प्रवाशालाच समजवण्याचा प्रयत्न करतात. मात्र हा जीवघेणा प्रवास असून याविरूद्ध अनेकदा वाहतूक पोलिस कारवाई करत असतात. मात्र या कारवाई सातत्य नसल्याने रिक्षा चालक बिनदिक्कतपणे चौथा प्रवासी भरूनच रिक्षा चालवतात.
मंगळवारी अंबरनाथच्या आनंदनगर औद्योगिक वसाहत ते अंबरनाथ रेल्वे स्थानक मार्गावर लोकनगरी स्मशानाजवळ नाल्यावर अंबरनाथ पूर्वेतील शिवाजीनगर पोलिसांनी सापळा रचत अशा रिक्षा चालकांवर कारवाई केली. अचानक पोलिसांनी रस्त्याचा ताबा घेऊन कारवाई सुरू केल्याने प्रवाशीही गोंधळले. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास या कारवाईत अनेक रिक्षा थांबवण्यात आल्या. त्यांचे छायाचित्र घेऊन रिक्षा चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक रमेश पाटील यांनी दिली आहे. यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.
आणि प्रवासी उतरवण्यास सुरूवात
सायंकाळी सहा वाजल्यापासून अंबरनाथ आनंदनगर औद्योगिक वसाहतीतल्या कंपन्यांतून कामगार सुटतात. ते रिक्षाने अंबरनाथ स्थानकापर्यंत प्रवास करतात. सायंकाळी कारवाईची बातमी वाऱ्यासारखी रिक्षाचालकांमध्ये पसरली. त्यानंतर आनंदनगर नाक्यापासूनच रिक्षाचालकांनी चौथा प्रवासी उतरवण्यास सुरूवात केली. त्यामुळे प्रवाशांनाही दुसऱ्या रिक्षांचा आधार घ्यावा लागला.