ठाणे : राज्यस्तरीय ‘यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान २०२५’ या राज्यस्तरीय पंचायत राज पुरस्कार सोहळ्यात ठाणे जिल्हा परिषदेच्या विविध सहा विभागांनी आपले नाव कोरले असून राज्यस्तरीय व्यासपीठावर ठसा उमटवला आहे. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ठाणे जिल्हा परिषदेच्या पंचायत राज संस्थांना तसेच कर्तव्यनिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मंगळवारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत सन २०२२-२३ या वर्षासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांना राज्यस्तरीय गुणवंत अधिकारी पुरस्कार प्रदान करण्यात आला. फडतरे यांनी या काळात जिल्हा परिषद सातारा येथे ग्रामपंचायत भवन बांधकाम, पाणी पुरवठा योजना, उपजीविका अभियान, जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, पथदिवे योजना, विविध इमारत बांधकाम योजना, रोजगार हमी योजना, तसेच पंचायत राज यंत्रणेच्या डिजिटलायझेशन अशा अनेक विभागांमध्ये प्रभावी अंमलबजावणी केली होती. त्यांच्या प्रभावी कार्यामुळे त्यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

तर, ठाणे जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील सहाय्यक लेखा अधिकारी संगीता घुरडे आणि पंचायत समिती, शहापूरचे सहाय्यक प्रशासन अधिकारी अजय भोंडीवले यांनाही यावेळी गुणवंत अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार मुरबाड तालुक्यातील मासले ग्रामपंचायतीचे विलास कृष्णा मिरकुटे व शहापूर तालुक्यातील वासिंदच्या ग्रामपंचायत अधिकारी विशाखा विवेक पाटील यांना प्रदान करण्यात आला. अत्युत्कृष्ट विभागस्तर पंचायत समिती पुरस्कार – पंचायत समिती, शहापूरला मिळाला असून, गट विकास अधिकारी नम्रता जगताप आणि तत्कालीन गट विकास अधिकारी भास्कर रेंगडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या उल्लेखनीय यशामुळे ठाणे जिल्हा परिषदेचे नाव राज्यस्तरावर गौरवाने घेतले जात आहे. हा सन्मान आगामी काळात कार्यक्षमता, पारदर्शकता आणि ग्रामविकासासाठी अधिक प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वर्धा जिल्हा परिषदेला २०२२-२३ या वर्षासाठी राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ३० लाख रुपये रक्कमेसह प्रदान करण्यात आले. ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे हे वर्धा जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी होते. घुगे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह हा पुरस्कार स्वीकारला. या गौरवप्रसंगी घुगे यांनी सांगितले की, यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान अंतर्गत मिळालेला हा गौरव म्हणजे केवळ संस्थेचा सन्मान नाही. तर,जिल्हा परिषदेच्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या आणि कर्मचाऱ्याच्या समर्पित सेवाभावाची पावती आहे. शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायती यांचा समन्वय अत्यावश्यक आहे.