लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे: खारघर येथे महाराष्ट्र भुषण पुरस्कार सोह‌ळ्यादरम्यान झालेल्या दुर्घटनेचा अनुभव लक्षात घेऊन राज्य सरकारने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय इमारत भुमीपुजन कार्यक्रमासाठी वातानुकूलीत मंडपाची उभारणी करून दुर्घटना होणार नाही, याची काळजी घेतल्याचे दिसून आले. एक हजार आसनक्षमता असलेल्या या मंडपामध्ये ओआरएस पावडर, पाणी बाटली आणि नाश्ता अशी व्यवस्था करण्यात आलेली होती.

निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. खारघर येथे झालेल्या या सोहळ्यादरम्यान १४ जणांचा उष्माघाताने मृत्यु झाला होता. या सोहळ्याच्या दिवशी तापमानात वाढ झालेली होती. त्यातच सकाळी म्हणजेच भर उन्हात हा कार्यक्रम घेण्यात आला होता. यावरूनच राज्य सरकारच्या कारभारावर टिका होत आहे.

हेही वाचा… दिवा-वसई रेल्वे मार्गावर रेल्वेगाडीच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

या दुर्घटनेच्या चौकशीसाठी महसुल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांची एक सदस्य समिती नेमली असली तरी याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी होत आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, याची काळजी घेण्यास राज्य सरकारने सुरुवात केल्याचे चित्र शनिवारी ठाण्यातील कार्यक्रमात दिसून आले.

हेही वाचा… डोंबिवलीत डम्परच्या धडकेत पादचारी ठार

ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागेवर ९०० खाटांचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर शनिवारी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. या सोहळ्यासाठी एक हजार आसन क्षमतेचा मंडप रुग्णालयाच्या मोकळ्या जागेवर उभारण्यात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या भल्या मोठ्या मंडपात उन्हाची झळ बसणार नाही, याची पुरेपुर काळजी घेण्यात आली होती. या ठिकाणी राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींसह, डाॅक्टर, रुग्णालयाचे कर्मचारी, विठ्ठल सायन्ना यांचे कुटूंबिय आणि नागरिक उपस्थित होते. या मंडपात एक हजार नागरिक उपस्थित असले तरी त्यांना उन्हाची झळ बसत नव्हती. या ठिकाणी एकूण ३६ वातानुकूलीत यंत्रणा बसविण्यात आल्या होत्या. त्यामुळे मंडपात गारेगार वातारवरण होते. त्याचबरोबर या मंडपामध्ये ओआरएस पावडर, पाणी बाटली आणि नाश्ता अशी व्यवस्था करण्यात आलेली होती.