भगवान मंडलिक, लोकसत्ता

कल्याण : ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या काही भागांतील पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी कर्जत तालुक्यातील पोशीर धरणाच्या बुडित क्षेत्र, माती सर्वेक्षणाचे काम जलसंपदा विभागाच्या माती सर्वेक्षण समिती लवकरच सुरू केले जाणार आहे.

यासाठी शासन पातळीवर वेगाने हालचाली सुरू आहेत. जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील कोकण पाटबंधारे विभागाने पालघर, रायगड जिल्ह्यांतील आठ लघु आणि मध्यम स्वरूपाच्या धरण प्रकल्पांच्या माती सर्वेक्षण आणि माघार पाणलोट क्षेत्रामुळे होणाऱ्या बाधित क्षेत्राच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. त्यात पोशीरचा समावेश आहे.

आणखी वाचा-ठाणे : क्षुल्लक कारणावरून दोन गटातील वादातून एकाची हत्या

वाढते नागरीकरण आणि त्यामुळे वाढत्या पाण्याची गरज याविषयी १५ वर्षांपूर्वी राज्य शासनाने जलतज्ज्ञ डॉ. माधव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रातील २० हून अधिक पाणी साठवण खोरे, धरणांचा अभ्यास केला. अभ्यास अहवालात ठाणे, रायगड जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या पोशीर धरणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. धरणासाठीच्या आवश्यक मंजुऱ्या घेऊन हे काम २०१६ मध्ये सुरू करून २०३०पर्यंत लोकसंख्येसाठी या धरणातील पाणी साठा उपलब्ध होईल, असे चितळे समितीने अहवालात म्हटले होते. त्यानंतर सरकारी पातळीवर हे काम विहित वेळेत पूर्ण झाले नाही. धरण उल्हास खोऱ्यातील कर्जत तालुक्यात येतो. चाई, बोरगाव, पेंडरीव, बोरशेत, चेवणे, उंबरखांड, भोपाळी येथे भूसंपादन केले जाईल. धरणात ३५५ दलघमी. इतका पाणीसाठा राहील.

आणखी वाचा-महायुतीचा उमेदवार जाहीर नाही पण, निवडणूक समिती जाहीर

रोज ७२० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा

या धरणाच्या उभारणीसाठी जागतिक बँकेकडून निधी उपलब्ध करून देण्याचे शासनाचे प्रयत्न सुरू होते. मात्र, त्यात यश आले नाही. याआधी धरणाच्या सर्वेक्षणास स्थानिक नागरिकांनी विरोध केला.

या प्रस्तावित धरणातून दररोज ७२० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. पोशीर धरण पूर्ण क्षमतेने विकसित झाल्यास मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रातील वाढत्या लोकवस्तीची पाणी चिंता दूर करणे शासनाला शक्य होणार आहे, असे जलसंपदा विभागाचे वरिष्ठाने सांगितले.

पोशीर धरणाच्या माघार पाणलोट क्षेत्रामुळे जे क्षेत्र बुडित होणार आहे. त्याच्या सर्वेक्षण कामासाठी शासनाने ६४ लाख रूपये तर धरणातील माती परीक्षणासाठी ८९ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पोशीर ही रायगड जिल्ह्यातील उल्हास खोऱ्यातून कर्जत तालुक्यातून वाहणारी उल्हास नदीची उपनदी आहे. ही नदी नेरळ, वांगणी, बदलापूर भागातून वाहते.

आणखी वाचा-डोंबिवलीत रस्ते अडवून बेकायदा गाळ्यांची उभारणी, ग प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांकडून नोटीस

पोशीर धरण

२,१९२ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित

१,२२१ हेक्टर क्षेत्र खासगी

९७१ हेक्टर क्षेत्र वन विभागाच्या मालकीचे

एमएमआर क्षेत्रातील पोशीर धरण हा महत्वाचा भविष्यकालीन प्रकल्प आहे. हा प्रकल्प मार्गी लागावा म्हणून आपण २० वर्षापासून प्रयत्नशील आहोत. या धरणाच्या माती, बुडित क्षेत्र कामाला शासनाने मंजुरी दिली आहे. भविष्यातील पाण्याची गरज ओळखून शासनाने या धरणाचे काम लवकर हाती घ्यावे. -राम पातकर, बांधकाम सल्लागार.