ठाणे: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर अनेक बडे नेते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्या पक्षांमध्ये गेल्याने तोळामासा अवस्था झालेल्या काँग्रेस पक्षाचे ओबीसी विभागाचे ठाणे शहराध्यक्ष राहुल पिंगळे यांनीही सोमवारी पदाचा राजीनामा दिला आहे. पदाचा ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असले तरी त्यांच्या राजीनाम्याच्या निमित्ताने ते दुसऱ्या पक्षात जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.
एकेकाळी ठाणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची मोठी ताकद होती. परंतु गेल्या काही वर्षात पक्षाची ताकद कमी झाल्याचे दिसून येते. महापालिकांमध्ये नगरसेवकांची संख्या कमी झालेली आहे. असे असतानाच, गेल्या काही वर्षात राजकीय महत्व वाढलेल्या ठाण्यावर काँग्रेस नेत्यांनी लक्ष केंद्रीत करत प्रदेश पातळीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सुरुवात केली होती.
यानिमित्ताने अस्तित्व कमी झालेल्या ठाणे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला पुर्नजिवत करून उभारी देण्याचे काम काँग्रेसच्या प्रदेश नेत्यांनी सुरु केल्याचे चित्र होते. परंतु अंतर्गत वादामुळे अनेकजण पक्षाला यापुर्वीच सोडून गेले. तर, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर अनेक बडे नेते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्या पक्षात गेले. यामध्ये वागळे इस्टेट भागातील माजी नगरसेवक मनोज शिंदे यांचा समावेश होता.
त्यांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश केला. यामुळे काँग्रेस पक्षाची तोळामासा अवस्था झालेली असतानाच, काँग्रेस पक्षाचे ओबीसी विभागाचे ठाणे शहराध्यक्ष राहुल पिंगळे यांनीही सोमवारी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग अध्यक्ष भानुदास माळी यांना यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. यानिमित्ताने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या असून पिंगळे हे सुद्धा पक्ष सोडणार असल्याीच चर्चा सुरू झाली आहे.
राजीनाम्यामागचे कारण पिंगळे यांनी स्पष्ट केलेपाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी पदावर असलेल्यांनी पदे रिक्त करण्याचा राष्ट्रीय काँग्रेस ने पारित केलेल्या ठरावानुसार, नैतिकदृष्ट्या माझ्या पदाचा राजीनामा देत एक आदर्श घालून दिला आहे. पक्षातील इतर लोकांना देखील काम करण्याची संधी मिळायला हवी, केवळ एकाच व्यक्तीने पाच वर्षे खुर्चीला चिकटून रहाणे हे मला पक्षाचा नियमानुसार अयोग्य वाटते. उदयोन्मुख तरुण काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी आपण मोठ मन करून संधी दिली, तर आणी तरच काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त होईल असे राहुल गांधी यांच्याप्रमाणे माझेही प्रांजळ मत असल्याचे राहुल पिंगळे यांनी सांगितले.