कल्याण : टिटवाळा भागातील बल्याणी, उंभार्ली भागात क्रिकेटच्या मैदानाशेजारी भूमाफियांनी बेकायदा चाळी उभारण्याचे काम पावसात सुरू केले होते. या बेकायदा बांधकामांची माहिती मिळताच अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी गुरूवारी सकाळी या चाळी तोडकाम पथकाच्या साहाय्याने भर पावसात जमीनदोस्त केल्या.

पाऊस सुरू झाल्याने परिसरात पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष नाही, असा विचार करून भूमाफियांनी टिटवाळा भागातील बल्याणी, उंभार्ली भागातील एका क्रिकेट मैदानाच्या शेजारी बेकायदा चाळी उभारणीचे काम सुरू केले होते. या बेकायदा बांधकामांमुळे क्रिकेट मैदानाच्या परिघ क्षेत्राला अडथळा आला होता. या बांधकामांच्या ठिकाणी जाण्यासाठी पोहच रस्ता नाही. तरीही भूमाफियांनी घाईघाईने मुसळधार पाऊस सुरू असताना चाळ उभारणीची कामे सुरू केली होती.

या बेकायदा बांधकामांमुळे आपल्या क्रिकेट मैदानाला बाधा येणार असल्याने क्रिकेटपटू, क्रीडाप्रेमी नाराजी व्यक्त करत होते. चाळीची बांधकामे करणाऱ्यांची स्थानिक पातळीवर दहशत असल्याने या बेकायदा चाळीच्या बांधकामांविषयी कोणीही उघडणे बोलण्यास, तक्रार करण्यास तयार नव्हते. अशाप्रकारे क्रिकेट मैदान परिसरात बेकायदा चाळींची बांधकामे सुरू झाली तर मैदानाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होण्याची भीती स्थानिक रहिवासी व्यक्त करत होते.

बल्याणी, उंभार्ली भागात क्रिकेट मैदानाजवळ बेकायदा चाळींची बांधकामे सुरू असल्याची माहिती कल्याण डोंबिवली पालिकेच्या अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांना मिळाली. बीट मुकादमाच्या माध्यमातून या बांधकामांची खात्री करून घेतली. क्रिकेट मैदानाशेजारी अडगळीच्या जागेत, पोहच रस्ता नसलेल्या ठिकाणी चाळींची बांधकामे सुरू असल्याची माहिती समजल्यावर गुरूवारी सकाळी तोडकाम पथक घेऊन साहाय्यक आयुक्त पाटील बल्याणी, उंभार्ली येथे पोहचले. या बांधकामांच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसल्याने जेसीबी तेथून नेणे शक्य नव्हते. त्यामुळे घणांच्या साहाय्याने ही निर्माणाधीन असलेली बांधकामे तोडण्यात आली.

मागील सात महिन्यांपासून टिटवाळा विभागात अ प्रभागाकडून दैनंदिन बेकायदा बांधकामांच्या विरुध्द कारवाई सुरू असुनही भूमाफिया बेकायदा चाळी उभारत असल्याने रहिवाशांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसाळा सुरू असल्याने आता बेकायदा बांधकामांवर कारवाई होणार नाही या भ्रमात बांधकामधारकांनी राहू नये. मुसळधार पाऊस सुरू असला तरी त्या पावसात बेकायदा चाळी, गाळ्यांची, इमारतींची बांधकामे जमीनदोस्त केली जाणार आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होणार नाही अशाप्रकारे कोणीही बेकायदा बांधकाम उभारण्यासाठी पुढाकार घेऊ नये. प्रमोद पाटील साहाय्यक आयुक्त,अ प्रभाग. टिटवाळा.