ठाणे : शहरातील नौपाडा, राममारुती रोड, गोखले रोड, स्थानक परिसर हे महत्त्वाची ठिकाणे आहेत. हे परिसर ठाणे स्थानक परिसरापासून जवळ असल्यामुळे दिवसभर या भागात नागरिकांची रेलचेल सुरु असते. परंतू, सायंकाळच्या वेळी या परिसरांमध्ये मोठ्याप्रमाणात परप्रांतीय फेरीवाल्यांचा विळखा पाहायला मिळतो. यासंदर्भात, काही दिवसांपूर्वी भाजपाचे माजी नगरसेवक सुनेश जोशी आणि मृणाल पेंडसे यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याबाबत निवेदन दिले होते. त्यावेळी आयुक्तांनी संबंधित विभागाला फेरिवाल्यांवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. परंतू, असे असले तरी या परिसरात सायंकाळच्यावेळी मोठ्याप्रमाणात फेरीवाले आपले बस्तान मांडून बसलेले पाहायला मिळत आहे. या फेरीवाल्यामुळे पादचाऱ्यांना मार्ग काढणे कठीण होत असून त्यांचा संताप होत आहे.

ठाणे पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातून दररोज लाखोंच्या संख्येने नागरिक प्रवास करतात. या स्थानक परिसराला जोडून गावदेवी परिसर, गोखले रोड, राम मारुती रोड, नौपाडा हे परिसर आहेत. तसेच या परिसरात विविध वस्तूंची दुकाने असल्यामुळे एकप्रकारे नागरिकांसाठी हे परिसर म्हणजे बाजारक्षेत्रच आहेत. या परिसरात सायंकाळच्या वेळी खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होत असते. अनेकदा खरेदीसाठी नागरिक स्वत:ची वाहने घेऊन येत असल्याने याठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी देखील होत असल्याचे पाहायला मिळते. परंतू, गेले काही महिन्यांपासून या दुकानांबाहेर परप्रांतीय फेरीवाले बसण्याच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. हे फेरीवाले पदपथ आडवून बसत असल्याने यामार्गावरुन येणाऱ्या जाणाऱ्या पादचाऱ्यांना याचा नाहक त्रास होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्थानक परिसर जवळ असल्यामुळे या भागात काम करणारे कर्मचारी पदपथाचा वापर करत स्थानक परिसरात जात असतात. सायंकाळी घरी जाण्याच्या वेळी लोकल सुटायला नको या भितीने ते लवकरात लवकर वाट काढत ठाणे स्थानक गाठत असतात. परंतू, पदपथांवर ठाण मांडून बसणाऱ्या या फेरीवाल्यांकडे खरेदी करण्यासाठी ग्राहक गर्दी करुन उभे असतात. या गर्दीतून वाट काढणे नागरिकांना कठीण होत आहे. हे चित्र दररोज सायंकाळी पाहायला मिळते. अनेकदा काही फेरीवाले पादचाऱ्यांवर अरेरावी करतानाही दिसून येतात. तर, या फेरीवाल्यांचा त्रास पादचाऱ्यांसह स्थानिक दुकानदारांनाही मोठ्याप्रमाणात होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. परंतू, अद्यापही या फेरीवाल्यांवर कारवाई होताना दिसत नाहिये. महापालिका या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात दुर्लक्ष करत आहे का ? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.