Thane Metro Train Update: मेट्रो मार्ग चार प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील वाहतुक अधिक मजबूत होणार आहे. यामुळे व्यवसाय केंद्रे, औद्योगिक पट्टे आणि शैक्षणिक संस्थांना याचा थेट फायदा होणार आहे. हा मार्ग दक्षिणेला मेट्रो मार्ग ११ (वडाळा–सीएसएमटी) आणि उत्तरेला मेट्रो मार्ग ४अ (कासारवडवली–गायमुख) आणि प्रस्तावित मेट्रो मार्ग १० (गायमुख–मीरा रोड) यांच्याशी जोडला जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबई–ठाणेकरांसाठी अखंड प्रवासाची सोय होणार आहे. या विस्तारानंतर प्रकल्पाची एकूण लांबी ५८ कि.मी. होणार असून हा भारतातील सर्वात मोठा मेट्रो मार्ग ठरेल. दररोज तब्बल २१.६२ लाख प्रवासी प्रवास करतील.
मुंबई महानगरातील वाहतुक कोंडी, उपनगरीय रेल्वे मार्गावरील ताण कमी करण्यासाठी मेट्रो मार्ग चार (वडाळा-घाटकोपर-कासारवडवली) आणि ४अ (कासारवडवली–गायमुख) प्रकल्प उभारला जात आहे. या मार्गिकेवर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गायमुख ते कॅडबरी जंक्शन पर्यंत चाचणी केली जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दावा केला की, वडाळा–घाटकोपर–मुलुंड–कासारवडवली–गायमुख या मार्गावर उभारण्यात येणारा हा प्रकल्प केवळ प्रवास सुविधा निर्माण करणार नाही, तर शहराच्या आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय विकासालाही चालना देईल असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केल्याने… सरनाईक यांचा दावा
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे ठाण्याच्या जनतेचे मेट्रो मधून प्रवास करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होत आहे. याबरोबरच गायमुख ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. त्यामुळे भविष्यात घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीतून मुक्तता होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. असा दावा सरनाईक यांनी केला.
प्रकल्प काय आहे - मार्गाची एकूण लांबी ३५.२० कि.मी. असून यात मेट्रो मार्गिका ४ ही ३२.३२ कि.मी. आणि ४ अ ही २.८८ कि.मी. आहे. मेट्रो ट्रेन आठ डब्यांच्या असतील व प्रतितास प्रतिदिशा प्रवासी संख्या (PHPDT) ३३,४१७ एवढी असेल.
तर देशातील सर्वात मोठी मार्गिका
- हा मार्ग दक्षिणेला मेट्रो मार्ग ११ (वडाळा–सीएसटीएम) व उत्तरेला मेट्रो मार्ग ४ए (कासारवडवली–गायमुख) आणि प्रस्तावित मेट्रो मार्ग १० (गायमुख–मीरा रोड) यांच्याशी जोडला जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबई–ठाणेकरांसाठी अखंड प्रवासाची सोय होणार आहे.या विस्तारानंतर एकूण लांबी ५८ कि.मी. होणार असून हा भारतातील सर्वात मोठा मेट्रो मार्ग ठरेल. दररोज तब्बल २१.६२ लाख प्रवासी प्रवास करतील. प्रवाशांच्या वेळेत ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत बचत होणार असून नागरिकांचा वेळ वाचणार असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.
ठाणे सारख्या महानगराला आधुनिक वाहतुकीची कास धरावी लागणार हे वास्तव आता टाळता येणार नाही. मेट्रो मार्ग ४ व ४अ या दृष्टीने नवा टप्पा ठरेल. वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि तासन्तास वाया जाणारा वेळ हे सर्व प्रश्न जटिल झाले आहेत. अशा वेळी पर्यावरणपूरक, सुरक्षित व जलदगती मेट्रो हा प्रवासाचा नवा पर्याय ठरेल. – प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री.