ठाणे : मेट्रो कारशेडकरिता मोघरपाडा येथील १७४ हेक्टर जागेचा ताबा जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी एमएमआरडीए कडे सुपूर्द केली आहे. परंतू, या जागेच्या योग्य मोबदल्याची पूर्तता अद्याप केलेली नाही. तसेच ही जागा बेकायदेशीर पद्धतीने शासनाने ताब्यात घेतली आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न तसेच समस्यांबाबत माहिती देण्यासाठी खारभुमी कृषी समन्वय समितीच्या वतीने शनिवारी ठाणे शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी कारशेडसाठी जमिन देण्यास विरोध केला आहे.

वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम ठाण्यात सुरु आहे. घोडबंदर येथील मोघरपाडा भागात मेट्रोच्या कारशेडची निर्मिती केली जाणार आहे. सुमारे ५० वर्षांपासून येथील शेतकऱ्यांचा या जमीनीवर उदरनिर्वाह सुरु आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचा आणि ग्रामस्थांचा या मेट्रो कारशेडसाठी जागा देण्यास विरोध आहे.

परंतू, शुक्रवारी जिल्हा प्रशासन, एमएमआरडीएचे अधिकारी प्रस्तावित कारशेडच्या जागेवर दाखल झाले. त्यानंतर येथे फलक उभारण्यात आले. १६७ शेतकरी खातेदार आणि अतिक्रमित करण्यात आलेल्या १७४ हेक्टर जमिनी ताब्यात घेण्यासंदर्भातील कारवाई अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्या उपस्थितीत झाली. त्यानंतर या जागेचा ताबा एमएमआरडीए कडे सुपूर्द करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परंतू, एमएमआरडीए कडे जमिन सुपूर्द करण्यात येणार आहे, यासंदर्भात कोणतिही पूर्वसुचना देण्यात आली नव्हती. तसेच मोबदल्याची देखील पूर्तता केली नव्हती, असा आरोप शेतकरी वर्गाकडून होऊ लागला आहे. जिल्हा प्रशासनाच्या या कारभारावर शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. शासनाच्या विविध आदेशांनुसार आणि दस्तऐवजांवर त्यांचा ताबा कायदेशीर आहे. परंतू, गुरुवारी रात्री १० ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत पोलिसांनी घरात घुसून दबावाखाली नोटिसा दिल्या आणि परिसरात फलक लावून जमीन ताब्यात घेतल्यामुळे शेतकरी वर्गाकडून याचा निषेध होत आहे. शेतकरी मेट्रो कारशेडच्या प्रकल्पास विरोध करीत नाही. परंतु, योग्य तो मोबदला आणि नुकसानभरपाई देत नाही तोपर्यंत कायदेशीर लढा चालूच ठेऊ, असा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिला.