ठाणे : शहरात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी फांद्या तुटून तर, वृक्ष उन्मळून पडले आहेत. तर, काही ठिकाणी ठाणे महापालिकेने वृक्षांची छाटणी करण्यास सुरुवात केली आहे. परंतू, या वृक्षांचे खोड, फांद्या रस्त्यावरुन अद्याप उचलले नसल्याची बाब समोर आली आहे. या कचऱ्यामुळे वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होऊ लागला आहे. घोडबंदर येथील वाघबीळ परिसरात सेवा रस्त्याच्या कामासाठी रस्त्यालगत असलेले एक भल्ल मोठ झाड कापण्यात आले होते. ते झाड त्याच ठिकाणी ठेवण्यात आल्यामुळे वाहन चालकांना अडथळा निर्माण होत आहे. तर अनेक ठिकाणी पदपथावर हा हरित कचरा रचून ठेवलेल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

ठाणे शहरात काही दिवसांपूर्वी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला होता. या पावसामुळे शहरात मोठ्याप्रमाणात वृक्ष उन्मळून पडले. वृक्षांच्या फांद्या देखील तुटून पडल्या होत्या. तर, काही वृक्षांच्या फांद्या धोकादायक स्थितीत असल्यामुळे ठाणे महापालिकेने या वृक्षांची छाटणी करण्यास सुरुवात केली. पंरतु, पावसामुळे पडलेल्या आणि छाटणी केलेल्या वृक्षांच्या फांद्या अनेक ठिकाणी पदपथ आणि रस्त्याकडेला तशाच पडल्याचे पाहायला मिळत आहेत. याचा त्रास नागरिकांना तसेच वाहन चालकांना होऊ लागला आहे. घोडबंदर येथील वाघबीळ परिसरात सेवा रस्त्याच्या कामासाठी रस्त्यालगत असलेले एक भल्ल मोठ झाड कापण्यात आले होते. या झाडांच्या फांड्या ओंडके त्याच ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. यामुळे याठिकाणी अपघात होण्याची भिती वाहन चलाकांकडून वर्तवली जात आहे.

ठाणे महापालिका वर्तकनगर प्रभाग समितीच्या प्रवेशद्वारावर झाडाच्या फांद्याचा ढीग लागला आहे. या फांद्याची पान पूर्णपणे सुकलेली असून ते रस्त्यावर पसरत आहेत. पाऊस ओसरल्यानंतर महापालिकेने ज्या झाडांच्या फांद्या धोकादायक स्थितीत आहेत. त्यांची छाटणी करण्यास सुरुवात केली आहे. परंतू, वृक्ष छाटणीनंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वृक्षांच्या फांद्या, ओंडके तसेच पदपथावर आणि रस्त्याच्या बाजूला ठेवले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. फांद्या रस्त्यावर इतरत्र पसरत असल्याने अपघाताची भिती व्यक्त केली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चरई येथे एका पदपथावरही अशाचप्रकारे छाटणी केलेल्या फांद्या रचून ठेवण्यात आल्या आहेत. लोकमान्य नगर, सावरकरनगर, यशोधननगर, कोरसकंपनीजवळ, नौपाडा, तीन हात नाका भागातही मागील अनेक दिवसांपासून फांद्या पडल्या आहेत. त्यातील काही फांद्या सुकून परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यासंदर्भात ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वृक्ष अधिकारी राजेश सोनावणे यांना संपर्क साधला असता, त्यांचाशी संपर्क होऊ शकला नाही.