ठाणे : ठाणे पुर्व स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी ‘स्थानक परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्प’ (सॅटीस ) प्रकल्प राबविण्यात येत असून या प्रकल्पात रेल्वे मार्गिकेच्या दोन्ही बाजूला उभारण्यात आलेल्या खांबांवर गर्डर बसविण्याचे काम प्रलंबित होते. या कामासाठी रेल्वे विभागाने हिरवा कंदील दाखविला असून या कामामुळे सॅटिस प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झाला आहे. २६ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत हे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी वाहतूक पोलिसांनी ठाणे पश्चिम आणि पुर्व बाजूला जोडणाऱ्या जुना कोपरी पुलावरील वाहतूक आठ दिवस ठराविक वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन तशी अधिसुचना काढली आहे.

ठाणे पश्चिम रेल्वे स्थानकातून दररोज साडेसात लाख प्रवासी प्रवास करतात. या भागात होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी स्थानकाच्या पश्चिमेला सॅटिस पुलाची उभारणी करण्यात आली. या पुलाच्या उभारणीनंतर येथील कोंडी काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र आहे. ठाणे पुर्व स्थानक परिसरातूनही अनेक नागरिक मोठ्या संख्येने प्रवास करतात. या ठिकाणीही वाहतूक कोंडी होत असून ती कमी करण्यासाठी या स्थानक परिसरातही पश्चिमेच्या धर्तीवर ‘स्मार्ट सिटी’ योजनेतून सुमारे २६० कोटी रुपये खर्चुन स्थानकाच्या पूर्वेला सॅटीस प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पातील उड्डाण पुलासाठी रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूला खांबांची उभारणी काही वर्षांपुर्वी करण्यात आली. मात्र, काही तांत्रिक अडचणीमुळे याठिकाणी खांबांवर गर्डर टाकणे शक्य होत नव्हते. या अडचणी दूर करत पालिकेने रेल्वे विभागाला पत्र पाठवून मार्गिका जोडणी कामासाठी रेल्वेचे दोन तासांचे १४ मेगाब्लाॅक देण्याची मागणी केली होती. त्यास रेल्वे विभागाने हिरवा कंदील देताच पालिकेने २६ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत हे काम करण्याचा निर्णय घेऊन त्याचे नियोजन आखले आहे. ४६ मीटर लांब आणि १२ मीटर रुंद गर्डर आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

प्रकल्पाचा आराखडा

या प्रकल्पात तुळजा भवानी मंदिर, पूर्व द्रुतगती महामार्गावरील सेवा रस्ता ते कोपरी कन्हैया नगर, एमजेपी कार्यालयापर्यंत असा एकूण २.२४ किमी लांबीचा उन्नत मार्ग असेल. यात १२ मीटर रुंद मार्गिका असतील. स्थानकात वाहतूक व्यवस्थापनासाठी ९ हजार चौरस मीटर डेक उभारणी. डेक उन्नत मार्गाला जोडण्यात येणार असून त्यात स्थानक इमारतीचाही समावेश असेल.

जुना कोपरी पुल वाहतूकीसाठी बंद राहणार

रेल्वे मार्गिकेच्या दोन्ही बाजूला उभारण्यात आलेल्या खांबांवर गर्डर बसविण्याचे काम २६ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत करण्यात येणार आहे. या कामादरम्यान, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी वाहतूक बदल लागू केले आहेत. यानुसार कोपरी सर्कल ते भास्कर कट दरम्यान दोन्ही बाजूच्या मार्गिकेवरील वाहतूक पुर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. हि अधिसुचना २६ ते २७ जुलै, २७ ते २८ जुलै आणि २९ ते ३० जुलै या दिवशी दुपारी २ ते सकाळी ११ वाजेपर्यंत तर, २८ ते २९ जुलै, ३० ते ३१ जुलै, १ ते २ ऑगस्ट, २ ते ३ ऑगस्ट आणि ३ ते ४ ऑगस्ट या कालावधीत रात्री ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत जुना कोपरी पुल वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असे आहेत वाहतूक बदल

ठाणे पश्चिमेकडुन मार्गाजवळील भास्कर कट येथून ठाणे रेल्वे स्टेशन पूर्व कडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना भास्कर कट येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही कोपरी सर्कल, फॉरेस्ट नाका, आनंद नगर सिग्नल, मुंबई नाशिक महामार्ग या पर्यायी मार्गे इच्छित स्थळी जातील. तीन हात नाका आणि टेलिफोन नाका येथून भास्कर कट मार्गे कोपरी सर्कल येथून ठाणे रेल्वे स्थानक पुर्वेकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना भास्कर कट येथे प्रवेश बंद’ करण्यात येणार आहे. ही वाहने गुरुव्दारा, आनंद नगर सिग्नल, फाॅरेस्ट नाका, कोपरी सर्कल मार्गे इच्छितस्थळी जातील. मुबई वरून हरिओमनगर कट मार्गे कोपरी कडे येणाऱ्या वाहनांना हरिओमनगर कट येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येणार आहे. ही वाहने आनंद नगर येथून महामार्गे मार्गे सरळ पुढे तीनहात नाका येथून युटर्न घेवुन आनंद नगर सिग्नल, फॉरेस्ट नाका, कोपरी सर्कल येथुन इच्छित स्थळी जातील. ही अधिसूचना पोलीस वाहने, अग्निशमन, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर, प्राणवायु पुरवठा वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही.