ठाणे : शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सोमवारी ठाण्यात अनोखे आंदोलन केले. या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ठाकरे गटाने आंदोलन करताना मंत्री संजय शिरसाट, माणिक कोकाटे, योगेश कदम आमदार संजय गायकवाड यांची नकल करणारे पथनाट्य सादर केले. यावेळी संजय शिरसाट यांची नकल करणाऱ्याने चक्क बॅग आणली होती. तर संजय गायकवाड यांची नकल करणारा बाॅक्सिंग खेळत होता. माणिक कोकाटे यांना डिवचण्यासाठी पत्ते खेळले जात होते. त्यामुळे हे आंदोलन पाहण्यासाठी नागरिकांची देखील गर्दी उसळली होती.

ठाकरे गटाच्या वतीने ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ सोमवारी महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्त ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी केले. विशेष म्हणजे या आंदोलनात वादात अडकलेल्या मंत्री आणि आमदारांची पथनाट्याद्वारे नकल करण्यात आली.

यावेळी संजय शिरसाट यांची नकल करणाऱ्याने बॅग आणली होती. तर संजय गायकवाड यांची नकल करणारे बाॅक्सिंग खेळत होते. त्यांच्या एका हातात डाळीने भरलेली पिशवी तर दुसऱ्या हातात बाॅक्सिंगसाठी लागणारे ग्लोज घातले होते. या ग्लोजने ते बाॅक्सिंग खेळत होते. माणिक कोकाटे यांचा विरोध म्हणून पत्ते खेळले जात होते. योगेश कदम यांच्यावरही डान्स बारच्या मुद्द्यावरून टीका करण्यात आली. हे आंदोलन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी ठाकरे गटाने जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त केला.

संजय गायकवाड यांची नकल करणारे बाॅक्सिंग खेळत होते. त्यांच्या एका हातात डाळीने भरलेली पिशवी तर दुसऱ्या हातात बाॅक्सिंगसाठी लागणारे ग्लोज घातले होते.

ठाण्यातून गद्दारीला सुरूवात झाली आणि कशाप्रकारे या महाराष्ट्राला लुटण्याचे काम या लोकांनी केले आहे. लाडक्या बहिणी, शेतकरी हतबल झाले आहेत, रोजगार पळवल्याने तरुण वर्ग यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे. महाराष्ट्रात मंत्र्यांचे डान्स बार सुरू आहेत कोणाचे लक्ष नाही. खिसे भरण्याचे काम केले जात आहे. मंत्री गादीवर बसून शेजारी भरलेल्या पैशांच्या बॅग ठेवून सिगरेटच्या धुरका उडताना, कृषी मंत्री रमी खेळण्यात बिझी आहेत, कॅन्टींग मध्ये बॉक्सिंग करतात काही मंत्री पालकमंत्री पदासाठी अघोरी बुवाबाजी करतात. पण एकही मंत्र्याचा राजीनामा घेतला गेला नाही. त्यामुळे हे सरकार भ्रष्ट लोकांना पाठीशी घालण्या मध्ये व्यस्त आहे.सत्तेचा व पैशाचा गैरवापर करून हे सरकार नव्या पिढीला देशोधडीला लावत आहे याचा निषेध करण्यात आल्याचे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले.