अंबरनाथ: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रातून केला जाणारा पाणी पुरवठा गुरुवार आणि शुक्रवारी बंद असणार आहे. गुरुवार दुपारी १२ वाजल्यापासून शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत येथे देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, उल्हासनगरसह ठाणे जिल्ह्यातील विविध शहरे, ग्रामपंचायती, औद्योगिक क्षेत्र यांचा पाणी पुरवठा बंद राहील. या काळात नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

बारवी धरण हे ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांना पाणी पुरवठा करणारे धरण आहे. नागरी वस्त्यांसह ग्रामपंचायती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, औद्योगिक वसाहती यांना हे पाणी पुरवले जाते. बारवी धरणातून निघणारे पाणी गुरुत्वाकर्षणाने उल्हास नदीला येऊन मिळते. पुढे आपटी बंधाऱ्याजवळ महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या वतीने यंत्रणा बसवण्यात आली आहे. येथून हे पाणी उचलले जाते. जांभूळ येथील जलशुद्धीकरण केंद्रात हे पाणी आणले जाते. येथे या पाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी ठाणे जिल्ह्यातील विविध महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती आणि विविध औद्योगिक वसाहतींना दिले जाते.

गेल्या आठवड्यात या केंद्रात देखभाल दुरुस्तीचे काम नियोजित करण्यात आले होते. १६ मे रोजी हे काम करणे प्रस्तावित होते. मात्र अशुद्ध पाण्याचा उपसा करणाऱ्या जलवाहिनीत १२ मे रोजी अचानक बिघाड झाला. त्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. या काळा कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात आला. या कारणामुळे नागरिकांना आणखी त्रास होऊ नये यासाठी १६ मे रोजी होणारे देखभाल दुरुस्तीचे काम स्थगित करण्यात आले होते. आता हे देखभाल दुरुस्तीचे काम शुक्रवार २३ मे रोजी होणार आहे. त्यासाठी गुरुवार २२ मे रोजी दुपारी १२ वाजल्यापासून शुक्रवार २३ मे दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण २४ तास हे देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. या २४ तासाच्या काळात पाणीपुरवठा बंद असेल. यंदा देखभाल दुरुस्तीचा वेळ पाहता सलग दोन दिवस पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार असल्याचे दिसते आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देखभाल दुरुस्तीच्या कामानंतर जांभुळ केंद्रातून पुरवठा केल्या जाणारे पाणी कमी दाबाने असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा आणि पाणी जपून वापरावे, असे आवाहन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.