कल्याण – सुट्ट्यामंचा हंगाम सुरू आहे. नागरिकांची कुटुंबीयांसह गावी जाण्यासाठी धडपड सुरू आहे. या गदारोळात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कल्याण आणि विठ्ठलवाडी बस आगारांंमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बसमध्ये चढत असताना त्याच्या गळ्यातील सोनसाखळी, मंगळसूत्र, हातामधील, पिशवीमधील मोबाईल हिसकावून चोरटे पळ काढत आहेत.बस आगारांमधील चोरीच्या या वाढत्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये विशेषता महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बदलापुर कात्रप भागात राहणारे प्रकाश नलावडे हे नोकरदार खेड शिवपूर येथून महाराजा हाॅटेल ते विठ्ठलवाडी बस आगारा दरम्यान मंगळवारी प्रवास करत होते. या प्रवासाच्या दुपारी एक ते संध्याकाळी सात या कालावधीत त्यांची बसमधील ८५ हजाराचा किमती ऐवज असलेली पिशवी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. आपली पिशवी चोरीला गेली आहे हे कळताच नलावडे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली.
कल्याण पश्चिमेत आरटीओ कार्यालय भोईरवाडी भागात राहणारे विजय उबाळे (६४) कल्याण येथील बस आगारातून अहिल्यानगर येथे शनिवारी सकाळी जात होते. अहिल्यानगर येथे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना चोरट्याने त्यांच्या गळ्यातील एक लाख ६५ हजार रूपयांची सोन्याची साखळी हिसकावून पळ काढला. सकाळच्या वेळेत हा प्रकार घडला. बसमध्ये चढल्यानंतर आपली सोनसाखळी गायब असल्याचे उबाळे यांना समजले. त्यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार कली.
पालघर येथील किराणा दुकानदार बाळु लामखडे शनिवारी सकाळी कल्याण नवीन बस आगारातून अहिल्यानगर येथे कुटुंबीयांसह जात होते. बसमध्ये सकाळच्या वेळेत कुटुंबीयांसह चढत असताना चोरट्याने बाळु लामखडे यांच्या गळ्यातील आणि त्यांच्या मुलाच्या गळ्यातील सोन्याची साखळी हातोहात लांबवली. चोरटा पळून गेला. साडे चार लाखाचा सोन्याचा ऐवज चोरीला गेल्याने बाळू लामखडे यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हवालदार पाटील तपास करत आहेत.
दरवर्षी सुट्टीचा हंगाम असला की कल्याण बस आगारात चोरट्यांचे प्रमाण वाढते. तरीही याविषयी एसटी महामंडळ प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करत नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. कल्याण, विठ्ठलवाडी बस आगारांमध्ये खासगी सुरक्षा यंत्रणा तैनात करून आगारात वावरणाऱ्या चोरट्यांवर नजर ठेवण्याची मागणी प्रवासी करत आहेत. गेल्या आठवड्यात कल्याण बस आगारातून लाखो रूपयांचा प्रवाशांचा किमती ऐवज चोरीला गेला आहे.