शहापूर : मुंबई नाशिक महामार्गावर मोटार अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. हा अपघात मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाताना कसारा गाव हद्दीत घडला आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आल्याने हा अपघात दोन ते तीन दिवसांपूर्वी घडला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. कसारा पोलिसांकडून अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

या अपघातात यज्ञेश वाघेला (२७, रा. खार), प्रविणकुमार सिंग (२७, रा. पवई), रजब अली शेख (२९, रा. कुर्ला पश्चिम) या तिघांचा मृत्यू झाला आहे. मुंबई नाशिक महामार्गाच्या कसारा गाव हद्दीतील उंबरमाळी गावच्या तीव्र उतारावर रस्त्याच्या डाव्या बाजूला २० फूट खोल आणि झाडाझुडपात अपघातग्रस्त मोटार असल्याची माहिती पोलिसांना मिळली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

अपघात परिसरात दुर्गंधी सुटल्याने मोटारीत मृतदेह असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. त्यानुसार पोलिसांनी अपघातग्रस्त मोटारीची तपासणी केली असता, त्यात दोन आणि मोटारीच्या बाहेरील बाजूस एक असे तीन मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. यातील एका मृत व्यक्तीची हरवल्याची तक्रार मुंबईमधील एका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असल्याची माहिती मिळाल्यानंंतर पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. तिघेही मुंबईतील रहिवासी असून ते नाशिकच्या दिशेने निघाले होते. कसारा गाव हद्दीतील उंबरमाळी गावच्या तीव्र उतारावर रस्त्याच्या डाव्या बाजूला त्यांची मोटार उलटली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस निरीक्षक सुरेश गावित, उपनिरीक्षक सागर जाधव, हवालदार उमेश चौधरी, राजेश माळी, संदीप माळी यांनी घटनास्थळी पाहणी करून नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. त्यांनतर शवविच्छेदनासाठी कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले.