डोंबिवली – भारतीय लष्कराच्या पाकिस्तान विरुध्दच्या यशस्वी ऑपरेशन सिंदूर कारवाईचा गौरव आणि भारतीय लष्कराच्या समर्थनार्थ रविवारी सकाळी भाजप, शिवसेनेतर्फे डोंबिवलीत तिरंगा यात्रा काढण्यात आली. पहलगाम येथील हल्ल्यात डोंबिवलीतील तीन पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे डोंबिवलीतील नागरिक, शिंदे शिवसेना, भाजपचे कार्यकर्ते अधिक संख्येने या तिरंगा यात्रेत सहभागी झाले होते.‘भारत माता की जय’ घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. सैनिक, लष्करी अधिकाऱ्यांच्या गौरव करणाऱ्या घोषणा नागरिकांकडून देण्यात येत होत्या. पाकिस्तानचा यावेळी निषेध केला जात होता. सहभागी महिलांकडून राष्ट्रभक्तीपर गीते गायली जात होती. रविवार असल्याने विविध स्तरातील नागरिक या तिरंगा यात्रेत सहभागी झाले होते.
भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, भाजपचे कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब, शिंदे शिवसेनेचे कल्याण ग्रामीण जिल्हाध्यक्ष महेश पाटील, भाजप डोंबिवली पूर्व मंडल अध्यक्ष मितेश पेणकर, भाजप, शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी, माजी नगरसेवक तिरंगा यात्रेत सहभागी झाल्या होत्या.बाजीप्रभू चौक येथून तिरंगा यात्रा फडके रस्त्यावरील गणेश मंदिर येथे आली. तेथून मग मदन ठाकरे चौक, टिळक रस्ता, कल्याण रस्ता मार्गे पाथर्ली येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे (घरडा सर्कल) कॅप्टन सचान स्मारक येथे यात्रेचा समारोप झाला.
समारोप कार्यक्रमात दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी भारत सरकारने उचललेल्या पाकिस्तान विरुध्दच्या ऑपरेशन सिंदूर या कणखर मोहिमेबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. या लष्करी मोहिमेत भारतीय लष्कराने आपल्या सामरिक क्षमतेचे दर्शन घडवित भारत देश दहशतवादा विरुध्द किती आक्रमक भूमिका घेऊ शकतो असे जगाला दाखवून दिले. या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा यांनी लष्करी हवाई तळांवर जाऊन या धाडसी कारवाईत सहभागी झालेल्या जवानांचे कौतुक केले. यामुळे आणि अशा तिरंगा यात्रांमुळे सैनिकांचे मनोबल वाढण्यास मदत होणार आहे. देशातील नागरिकांनीही पाकिस्तान विरुध्दच्या ऑपरेश सिंदूर कारवाईच्यावेळी आपल्या एकजुटीचे प्रदर्शन विविध माध्यमांतून दाखविले. ही एकजूट पाकिस्तानला यापुढील धडा शिकविण्यास पुरेशी आहे, अशी मते यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरुध्द भारताने राबविलेल्या ऑपरेश सिंदूर कारवाईमुळे भारताच्या लष्करी शक्तीचे सामर्थ्य जगाने पाहिले. पाकिस्तानने कितीही कोणत्याही वल्गना केल्या तरी आमच्या देशात राहून आम्ही तुमच्या दहशतवाद्यांचा खात्मा करू शकतो हे आपरेशन सिंदूर कारवाईने दाखवून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार प्रसंगी दहशतवादा विरुध्द किती कठोर, कणखर होऊ शकते हेही जगाने पाहिले. यानिमित्ताने देशाची एकजूट आणि देश कसा लष्काराच्या पाठीशी आहे हे दाखविण्यासाठी विविध भागात तिरंगा यात्रा काढल्या जात आहेत. – रवींद्र चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष,भाजप.