बदलापूरः सक्तीने आणि कोणत्याही संमतीशिवाय बसवल्या जाणाऱ्या टीओडी मीटरविरोधात सोमवारी शहरातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी बदलापूर पूर्वेतील खरवईच्या महावितरण कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन केले. या आंदोलनाप्रकरणी आता आंदोलकांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या आंदोलनानंतर महावितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने आंदोलकांची मागणी मान्य करत सक्तीने आणि संमतीशिवाय मीटर बदलले जाणार नाही असे लेखी आश्वासन दिले आहे.
राज्यभरात महावितरणातर्फे टीओडी अर्थात टाईम ऑफ डे या तत्वावर आधारीत मीटर घरगुती ग्राहकांकडे बसवले जात आहेत. कल्याण परिमंडळात सव्वा दोन लाखांहून अधिक मीटर बदलून नविन मीटर लावण्यात आले आहेत. तर बदलापूर विभागातही सुमारे ४३ हजार मीटर बदलण्यात आले आहेत. मात्र या मीटरमुळे अवास्तव बिले आल्याची तक्रार काही ग्राहकांनी केली आहे. सोबतच हे मीटर बदलताना ग्राहकांची कोणतीही समंती तसेच संबंधित गृहसंकुलांना विश्वासात घेतले जात नसल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यामुळे सोमवारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि कॉंग्रेस तसेच घटक पक्षांच्या वतीने बदलापूर पूर्वेतील खरवई महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
या मोर्चावेळी आंदोलकांनी परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच येथील कार्यकारी अभियंता आनंद काटकर यांची खुर्ची बाहेर आणून त्यावर गौतम अदानी यांचा फोटो लावत आंदोलन केले. याप्रकरणी कर्मचाऱ्याच्या वतीने दिलेल्या तक्रारीनंतर या सर्व आंदोलकांविरूद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप ठेवत बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात अविनाश देशमुख, हेमंत रूमणे, संजय जाधव, किशोर पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी आणि ४० हून अधिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. शासकीय कामात अडथळा, वीज ग्राहकांना कामात अडथळा, दोन तास कामकाज बंद पाडणे असे आरोप आंदोलकांवर ठेवण्यात आले आहेत.
अशा गुन्ह्यांनी आम्हाला काही फरक पडणार नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या घेऊन आम्ही आंदोलन केले. आमच्या आंदोलनानंतर महावितरणाच्या कार्यकारी अभियांत्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिले आहे. त्यामुळे आमचे आंदोलन सत्याला धरून होते. – अविनाश देशमुख, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष.
मग गुन्हा का?
आदोलकांनी केलेल्या मागण्यांवर बोलताना महावितरणाचे कार्यकारी अभियंता यांनी आंदोलकांचे म्हणणे समजून घेतले. ग्राहकांना विचारल्याशिवाय मीटर बदलले जात असल्याचे त्यांनी मान्य केले. तसेच यापुढे संमतीशिवाय कोणतेही मीटर बदलले जाणार नाही असे लेखी आश्वासनही दिले. मग त्यानतंरही आंदोलकांवर गुन्हे का असा प्रश्न आता आंदोलकांनी उपस्थित केला आहे.