ठाणे : ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात मागील सहा महिन्यांपासून बंद असलेली टोईंग कारवाई पुन्हा सुरू करण्याचा निर्णय ठाणे वाहतुक शाखेने घेतला आहे. चुकीच्या पद्धतीने होणारी कारवाई आणि टोईंग वाहनांवरील कर्मचाऱ्यांमुळे होणारे वादाच्या अनेक तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. नागरिकांच्या तक्रारीनंतर वाहतुक पोलिसांना ही कारवाई बंद करावी लागली होती.
ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहराचा भाग येतो. येथे ठाणे शहर वाहतुक पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाते. रस्त्यालगत बेकायदेशीपणे उभ्या असलेल्या दुचाकींवर टोईंग वाहनाद्वारे कारवाई होत होती. ही कारवाई करताना टोईंग वाहनांवरील कर्मचारी हे चालकांसोबत वाद घालत असे. अनेकदा चालक हा दुचाकीपासून काही अंतरावर असतानाही त्याची दुचाकी उचलली जात होती. त्यामुळे अनेक तक्रारी वाहतुक पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. टोईंग बंद व्हावी यासाठी आंदोलने देखील झाली होती. त्यामुळे टोईंग कारवाई बंद करण्याची वेळ वाहतुक पोलिसांवर आली होती. आता ही टोईंग कारवाई पुन्हा सुरू करण्याचा निर्णय ठाणे वाहतुक शाखेने घेतला आहे.
टोईंग वाहनावर सीसीटीव्ही कॅमेरे व उद्घोषक बसविण्यात आले आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील दहा दिवसांचे चित्रीकरण जतन केले जाणार आहे. उद्घोषकावरुन उद्घोषणा केल्यानंतर वाहनांवर कारवाई केली जाईल असे वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी स्पष्ट केले.