बदलापूरः बदलापूर शहरात पूर्व पश्चिम वाहतुकीसाठी असलेल्या उड्डाणपूल आणि भुयारी मार्गापैकी भुयारी मार्ग गेल्या काही दिवसांपासून जोड रस्त्याच्या कामासाठी बंद आहे. त्यामुळे बदलापूर शहरातील एकमेव उड्डाणपूलावर मोठ्या प्रमाणावर भार येतो आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या भागात कोंडी होते आहे. मात्र रविवारी संपूर्ण बदलापुरात महत्वाच्या रस्त्यांवर कोंडी पाहायला मिळाली. स्थानक परिसर, उड्डाणपूल, पूर्व भागातील कात्रप अशा सर्वच भागात कोंडी झाली होती. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.
बदलापूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्याचसोबत शहरात वाहनांची संख्याही वाढली आहे. शहरात जवळपास सर्वच रस्ते कॉंक्रिट केले जात असले तरी शहरात पूर्व पश्चिम प्रवास करण्यासाठी उड्डाणपुल उभारण्यात स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासनाला यश येताना दिसत नाही. त्यामुळे शहरात अस्तित्वात असलेल्या एकमेव उड्डाणपूल आणि भुयारी मार्गावर अवलंबून राहावे लागते आहे. बदलापूर शहराच्या मध्यातून गेलेल्या रेल्वे रूळामुळे शहर दोन भागात विभागले आहे. त्यामुळे पूर्व पश्चिम प्रवास करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.
बदलापूर शहराच्या बेलवली भागात असलेला रेल्वेखालील भुयारी मार्ग २६ मे रोजी बंद करण्यात आला. या मार्गात अवकाळी पावसामुळे मोठे पाणी साचले. तसेच येथे एक चारचाकीही अडकली. त्यानंतर कार काढण्यात आली. मात्र त्याचवेळी येथील भुयारी मार्गाला जोडणारा जोडरस्ता तयार करण्यासाठी खोदण्यात आला. या रस्त्याचे सध्या काम सुरू आहे. मात्र या रस्त्यामुळे येथील वाहतूक पूर्णपणे शहरातल्या एकमेव उड्डाणपुलावरून होते आहे. त्यामुळे येथे वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. परिणामी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
रविवारी शहराच्या सर्वच प्रमुख रस्त्यांवर कोंडी पाहायला मिळाली. स्थानक परिसरात सकाळपासूनच बाजारपेठ भरल्याने कोंडी होत होती. वैशाली चित्रपटगृहाबाहेर वाहतूक पोलिस उपस्थित होते. मात्र रस्त्याचा बहुतांश भाग फळवाले, भाजी विक्रेते, रिक्षा, चाकचाकी वाहने आणि बेशिस्त दुचाकीस्वारांनी पार्किंग केल्याने व्यापला होता. परिणामी वाहने निघण्यात अडचणी येत होत्या. पूर्वेत जाण्यासाठी अनेक जण मासळी बाजाराशेजारच्या चिंचोळ्या रेल्वेपुलाखालच्या रस्त्याचा वापर करतात. मात्र बाजारात आलेल्या ग्राहकांनी भररस्त्यात वाहने उभी केल्याने येथेही कोंडी झाली. पूर्वेतही कर्जत मार्गावर कोंडी होती. त्यामुळे जवळपास सर्व शहरच कोंडीत अडकल्याचे चित्र होते. प्रवाशांना पूर्व पश्चिम प्रवासासाठी मोठा वेळ लागत होता. कोंडीत अडकलेले प्रवासी संताप व्यक्त करत होते.