शहापूर : शेतकरी आणि शेतमजुरांचे प्रश्न, वनहक्क, पाणीपुरवठा, रोजगार, कर्जमाफी अशा अनेक मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली शहापुर तालुक्यातील आदिवासी बांधवांनी शहापुर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. या पूर्वी देखील मोर्चे आणि आंदोलन करून देखील जनतेचे प्रश्न सुटले नसल्यामुळे प्रशासनाला जागे करण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला असल्याचे आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले.
शहापुर तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत रखडलेली कामे पूर्ण करावीत, वनपट्टे धारकांना सरकारी योजनेचा लाभ मिळावा, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या घरांना नुकसान भरपाई मिळावी, आदिवासींना दिलेल्या प्लॉटवर झालेले अतिक्रमण हटवावे, वनपट्टे धारकांना सातबारा मिळावा, पेसा कायद्यानुसार रिक्त पदांची तातडीने भरती व नागरी सुविधा पुरवाव्यात, शेती व पिण्यासाठी धरणांचे पाणी शेतकऱ्यांना मिळावे, शेतकरी व शेतमजुरांना कर्जमाफी मिळावी, अंगणवाडी इमारतींचे बांधकाम पूर्ण करून आहाराचा दर्जा सुधारावा, बेलनाळा ते दहिगाव रस्त्याचे काम तातडीने सुरु करावे, विद्युत पुरवठ्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, तालुक्यातील ७२ गावांवरील हरितक्षेत्र कायदा रद्द करावा अशा विविध मागण्या या मोर्चादरम्यान आदिवासी बांधवांनी मांडल्या.
मोर्चाच्या प्रतिनिधींनी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांची भेट घेऊन सर्व मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी कासुळे यांनी तालुकास्तरावरील मागण्या तातडीने सोडवण्याचे आश्वासन दिले असून उर्वरित मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवून लवकरात लवकर त्या मार्गी लावण्यात येतील, असे सांगितले.