वसईत अरूण टिकेकरांना आदरांजली

‘‘अरूण टिकेकर हे केवळ द्रष्टे संपादक नव्हते तर संशोधकही होते. त्यांच्याकडून बरेच काही घ्यायचे राहून गेले,’’ अशी खंत ज्येष्ठ संपादक आणि लेखक प्रदीप कर्णिक यांनी व्यक्त केली. अरूण टिकेकरांना विविध संस्थांच्या वतीने शनिवारी श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

कोमसाप, साहित्य जल्लोष प्रतिष्ठान, डिंपल प्रकाशन, विवा कट्टा, साहित्य संगम मासिक आदींच्या वतीेने माणिकपूरच्या समाजउन्नती सभागृहात हा आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कर्णिक यांनी यावेळी टिकेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. रानडे यांच्याकडून त्यांनी उदारमताचा वारसा घेतलेला होता. त्यांच्या लेखनाची वैचारिकता आणि समज उच्च कोटीची होती, असे ते म्हणाले.

उत्तम संपादक असलेले टिकेकर उत्तम प्रशासकही होते. मुंबई विद्यापीठ आणि पुणे शहराच्या इतिहासावर त्यांनी केलेले संशोधन थक्क करणारे होते. व्यासंगी आणि ग्रंथप्रेमी टिकेकरांकडून घेण्यासारखे एवढे आहे की आपले आयुष्य कमी पडेल, असेही ते म्हणाले.

सर्वत्र वैचारिक खुजेपणा आलेला असताना टिकेकरांचं जाणं दु:खद आहे अशी खंत लेखिका आणि कवयित्री सिसिलिया काव्‍‌र्हालो यांनी व्यक्त केली.

मत प्रकट करायला शिका, असे टिकेकर म्हणायचे. कारण त्याच्यातून चळवळ निर्माण होते. टिकेकरांच्या जाण्याने महान परंपरा खंडित झाल्याचे त्या म्हणाल्या.

मुंबईलगत शहरे विकसित झाली. त्यांच्या नागरीकरणातून जे प्रश्न आणि तणाव निर्माण झाले त्याबद्दल टिकेकरांनी मार्गदर्शन केले. शहरांच्या प्रश्नाबद्दल बोलत असताना मानवी व्यवहारांबाबतही त्यांनी भाष्य केले, असे

कवी सायमन मार्टिन यांनी

सांगितले. मूल्याचा ऱ्हास होत असताना टिकेकरांसारखे द्रष्टे दिशा दाखवत होते, असेही ते पुढे म्हणाले.

डिंपल प्रकाशनाच्या अशोक मुळ्ये यांनी सूत्रसंचालन केले. हरिहर बाबरेकर, उमाकांत वाघ, मनवेल तुस्कानो आदींनीही टिकेकरांना श्रद्धांजली वाहिली.