ठाणे : एमआयडीसीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात तातडीची दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे कळवा, मुंब्रा, दिवा परिसराचा पाणी पुरवठा उद्या, मंगळवारी बंद राहणार आहे. या बंदनंतर पाणीपुरवठा सुरू झाल्यावर पुढील काही तास कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. यामुळे या भागातील नागरिकांना पाणी टंचाई समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

ठाणे शहरात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यासाठी हे स्रोत महत्वाचे मानले जातात. यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणारा पाणी पुरवठा कळवा, मुंब्रा, दिवा परिसरात होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रात, तातडीचे आणि अत्यंत महत्वाच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे सोमवार, १७ मार्च रोजी रात्री १२ ते मंगळवार १८ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत असा २४ तासांसाठी कटाई ते ठाणे दरम्यान पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे, ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा, मुंब्रा आणि दिवा या परिसरात २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच, मंगळवारी रात्री पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील काही तास कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी नागरिकांनी आवश्यक तो पाणीसाठा करून ठेवावा तसेच पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.