डोंबिवली – कल्याण शिळफाटा रस्त्यावरील पलावा चौकात दुपारच्या वेळेत पुलाच्या कामावरील डांबर मिश्रित खडीचा काही भाग अचानक एका प्रवासी वाहनाच्या पाठीमागील भागावर कोसळला. आठ ते दहा फुटावरून डांबर मिश्रित खडी वाहनावर कोसळल्याने वाहनाच्या पाठीमागील बाजुची काच फुटली आणि काही भाग खडीच्या दणक्याने खराब झाला. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही.

शिळफाटा रस्त्यावरील मागील सात वर्षापासून रखडलेल्या पलावा पुलाचे काम लवकर पूर्ण करावे या मागणीसाठी रविवारी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी एकत्रित येत कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आंदोलन केले होते. पलावा पूल लवकर सुरू करा, अशी त्यांची आग्रही मागणी होती. या आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या पुलाचे काम गतीने सुरू केले आहे. जून अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल, असे आमदार राजेश मोरे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी जोरदार धावपळ सुरू झाली आहे.

पुलावर क्रेनच्या साहाय्याने डांबर मिश्रित खडी टाकण्याचे काम सोमवारी सुरू करण्यात आले आहे. या कामाची लगबग सुरू असताना सोमवारी दुपारी एक टी परमिटचे वाहन पलावा पूल चौक भागातून जात होते. त्यावेळी अचानक क्रेनच्या साहाय्याने पुलावर टाकण्यात असलेल्या डांबर मिश्रित खडीचा काही भाग प्रवासी वाहतूक करणाऱ्या पलावा चौक भागातून जात असलेल्या मोटारीच्या पाठीमागील भागात कोसळला. आठ ते दहा फुटावरून हा गिलावा मोटारीवर पडल्याने मोटारीची मागची काच फुटली. त्या काचेतून काही गिलावा आसनावर पडला. आणि काही गिलावा मोटारीच्या टपावर आणि मागच्या कवचावर पडला.

मोठा आवाज झाल्याने आपल्या वाहनाचा टायर फुटला असे सुरूवातीला मोटार चालकाला वाटले. त्याने मागे वळून पाहिले तर त्याला मोटारीवर डांबर मिश्रित खडीचा गिलावा पडल्याचे दिसले. त्याने तात्काळ वाहन बाजुला घेत थांबवले. घडला प्रकार काम करणाऱ्या पर्यवेक्षकाला सांगितला. हा प्रकार घडताच काही वेळ काम थांबविण्यात आले. या कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचे उपाय न करता घाईत काम सुरू असल्याने हा प्रकार घडला आहे, असे प्रवाशांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पलावा चौकात एक दारूचे आणि मिठाईचे दुकान आहे. या दुकानांना राजकीय आशीर्वाद आहे. ही दुकाने पुलाच्या कामात अडथळा ठरत आहेत. या दुकानांना हात न लावता पलावा पुलाचे काम पूर्ण करा, असा एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आहे. ही अवैध दुकाने वाचविण्यासाठी पुलाचे संरेखन बदलून तेथील आधार खांबांची नियोजित जागा बदलली असल्याचा आरोप यापूर्वीच माजी आमदार राजू पाटील यांना केला आहे. दारुचे दुकान हटविण्यासाठी राजू पाटील मागील पाच वर्षापासून प्रयत्नशील आहेत. पण दारू दुकानदाराला भक्कम राजकीय वरदहस्त असल्याने त्यांना हटविण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नसल्याचे राजू पाटील यांनी सांगितले.