ठाणे : ठाणे जिल्ह्यात असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरण परिसरात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे तानसा धरण भरून वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे धरणाखालील व नदीच्या परिसरातील गावांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये आणि उल्हास नदीच्या पाणी पातळीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात असलेल्या शहापूर तालुक्यात तानसा धरण आहे. या धरणातून बृहन्मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा केला जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मीटर टीएसडी इतकी आहे. शनिवारी रात्री ही पातळी १२६.६०२ मीटर टीएसडी हुन जास्त झाली आहे. त्यामुळे लवकरच धरण ओसंडून वाहण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने तानसा धरणाखालील व नदीच्या परिसरातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी आणि पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.  धरणातून विसर्ग होत असताना ग्रामस्थांनी काळजी घ्यावी. तसेच महसूल व पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.