लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : आम्हाला राजकारणात पडायचे नाही. राजकारण आमचा विषयही नाही. मात्र आमच्या हृदयात तुम्ही हात घालाल आणि आमच्या अध्यात्म शक्तीला आव्हान द्याल तर त्याचे उत्तरही तसेच मिळेल. हिंदू समाज शांत बसणार नाही अशा शब्दांत ह.भ. प. योगीराज महाराज यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना ठणकावले. तसेच या वक्तव्याचा संपूर्ण ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाच्या वतीने आणि राज्यस्तरीय अखंड हरिनाम महोत्सव आणि श्रीमलंगगड हरिनाम महोत्सव समितीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
अंबरनाथ तालुक्यात श्री मलंगगडाच्या पायथ्याशी सुरू असणाऱ्या राज्यस्तरीय हरिनाम सप्ताहामध्ये ते बोलत होते. ह. भ. प. योगीराज महाराजांसह या हरिनाम सप्ताहाच्या आयोजकांकडूनही जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध करण्यात आला.
आणखी वाचा-ठाण्यातील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त होणार, आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना महत्वाच्या सुचना
ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील वारकरी मंडळांच्या विद्यमाने श्रीमलंगगडाच्या पायथ्याशी कोकण प्रांतातील सर्वात मोठ्या राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या चौथ्या दिवशी ह. भ. प. योगीराज महाराजांचे यांच्यसह विविध कीर्तनकारांचे कीर्तन पार पडले. यावेळी कीर्तनकारांनी आणि आयोजकांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी प्रभू श्रीरामाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा जाहीर निषेध केला.
अभ्यास नसणारी माणसं सध्या प्रभू श्रीरामाबद्दल बोलत आहेत की श्रीराम मांसाहारी होते म्हणून. परंतु आमच्याकडे संत एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायणाचा पुरावा आहे. त्यात संत एकनाथ महाराजांनी असे सांगितले आहे की जेव्हा प्रभू श्रीरामांना आपले वडील गेल्याचे भरताकडून समजले. तेव्हा वडिलांचे श्राद्ध करण्यासाठी पिंड देण्यात आले. त्यावेळी प्रभू श्रीरामचंद्रांनी सांगितले की शास्त्राचा नियम असा आहे की आपण ज्या गोष्टी खातो त्याचेच पिंडदान करावे लागते. मात्र वनवासात आपण अन्न खात नाही, कंदमुळे आणि फळे खाऊन जगतोय. त्यामुळे आपल्याला वडिलांचे श्राद्ध करता येणार नाही असे भावार्थ रामायणात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ऐऱ्या गैऱ्याच्या बोलण्यावर काहीही विचार करू नका, विश्वास ठेवू नका, आपला प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम आहे, आपला आदर्श असल्याचे मत पैठण येथील ह.भ. प. योगीराज महाराज यांनी या सप्ताहात व्यक्त केले.