डोंबिवली – डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील सर्वाधिक वर्दळीच्या बाजीप्रभू चौक आणि श्री गणेश मंदिराजवळील ज्येष्ठ नागरिक कट्टा उद्यानाजवळ गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचे पाणी तुंबत असल्याने प्रवासी, वाहन चालकांचे हाल होत आहेत. तुंबलेले पाणी वाहून जाण्यासाठी कोणतीही हालचाल प्रशासनाकडून केली जात नसल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळ बाजीप्रभू चौकात केडीएमटी, एस. टी. चा बस थांबा आहे. एमआयडीसी, २७ गाव, शिळफाटा परिसरात जाणारे रिक्षा वाहनतळ या भागात आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकात जाणारे आणि बाहेर पडणारे प्रवासी याच भागातून येजा करतात. बाजीप्रभू चौक, चिमणी गल्ली हा भाग बाजारपेठेचा आहे. प्रवाशांची या भागात सतत वर्दळ असते. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस बाजीप्रभू चौकातून वाहतूक करतात.

बाजीप्रभू चौकातील बस थांब्यालगत मुसळधार पावसामुळे गेल्या तीन दिवसांपासून पाण्याचे तळे साचले आहे. या तुंबलेल्या पाण्याला ओलांडून, काही जण त्यामधून प्रवास करतात. या भागात फळ, फूल विक्रेते बसलेले असतात. मागील तीन दिवसांपासून तुंबलेल्या या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे, अशा तक्रारी प्रवासी, विक्रेत्यांनी केल्या. पालिका आपत्कालीन विभागाचे कर्मचारी दररोज या रस्त्याने जातात. त्यांना हे तुंबलेले पाणी दिसत नाही का, असे प्रश्न प्रवासी करत आहेत.

आयुक्त अभिनव गोयल यांनी पावसाळ्यात शहर परिसरात कोठेही पावसाचे पाणी तुंबून नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश प्रभाग साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्याची अंमलबजावणी डोंबिवलीत होत नसल्याचे चित्र आहे.

डोंबिवली पूर्व गणेश मंदिराजवळील नेहरू रस्ता भागात ज्येष्ठ नागरिक कट्ट्याजवळ मुसळधार पावसामुळे पाणी तुंबले आहे. हे पाणी वाहून जाण्यासाठी भुयारी गटारांजवळ कोणतीही सोय नसल्याने हे पाणी मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर साचून राहते. या तुंबलेल्या पाण्यातून वाहन चालक वाहने नेण्यास धजावत नाहीत. पादचारी या तुंबलेल्या पाण्यामुळे रस्त्यामधून चालतात. त्यामुळे वाहने या रस्त्यावरून संथगतीने चालविली जात असल्याने या रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडी होत आहे.

लहान, जड, मोठी वाहने या रस्त्यावरून धावतात. या रस्त्यावर तुंबलेल्या पाण्याच्या बाजुला रिक्षा वाहनतळ आहे. गणेश मंदिराचा अंत्येष्टीचे विधी करण्याचा ओटा येथे आहे. या विधी कार्यासाठी वाहने येऊन येणाऱ्या नागरिकांना तुंबलेल्या पाण्यात किंवा गणेश मंदिराच्या दर्शनी भागात वाहने उभी करावी लागत आहेत. सकाळ, संध्याकाळ गणेश मंदिराजवळील ज्येष्ठ नागरिक कट्टा भागात फिरण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठांची तुंबलेल्या पाण्याने गैरसोय होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेहरू रस्त्यावर रेल्वे स्थानक भागात सीमेंट काँक्रीट रस्त्याची कामे सुरू आहेत. वाहन चालक फडके रस्ता, बाजीप्रभू चौकातून इच्छित स्थळी जातात. त्यांना बाजीप्रभू चौक, नेहरू रस्त्यावरील तुंबलेल्या पाण्यातून जावे लागते. वरिष्ठांनी पालिकेच्या प्रभागातील आपत्कालीन विभागाला या दोन्ही ठिकाणचा पाण्याचा निचरा करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.