नोटाबंदीच्या निर्णय जाहिर झाल्यानंतर सर्वसामान्यांना खूप मोठा धक्का बसला. अचानक ५०० आणि १०००च्या नोटा चलनातून बाद होतील तेव्हा करायचे काय? असा प्रश्न ८ नोव्हेंबरला सगळ्यांनाच पडला होता. काही काळ तणावाचे वातावरण होते. अशा अचानक नोटा चलनातून बाद कशा काय होऊ शकतात? असे एक ना अनेक प्रश्न मनात होते. पण नंतर मात्र या ताणवावर व्हॉट्स अॅपमुळे व्हायरल झालेल्या विनोदांनी अशी काही फुंकर घातली की सारं टेन्शन काही क्षणात कुठच्या कुठे पळाले. या विनोदातही 'सैराट' फिव्हर पाहायला मिळाला आणि नोटाबंदी नंतर आर्ची आणि परश्याची जोडी पुन्हा एकदा हिट झाली आहे. फेसबुकवरच्या 'द रॅशनल इंडियन' या पेजने नोटा बंदी आणि अार्ची परश्या यांना घेऊन एकापेक्षा एक विनोदाची मालिका सोशल मीडियावर आणली. अर्थात ही विनोदाची मालिका सोशल मीडियावर खूपच फिरत आहे. नोटांबदीच्या निर्णयानंतर अनेकांनी बँकेच्या बाहेर लांब लचक रांगा लावल्या होत्या. लोक तासन् तास रांगेत उभे होते. अशा परिस्थितीत आर्ची आणि परश्या सापडले तर काय होईल असे एक ना अनेक विनोद तयार करण्यात आले आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर 'उठा उठा सकाळ झाली, नोटा बदलण्याची वेळ झाली’, ‘या वर्षी कोणी लग्न करु नका, पाकिटात १०१ रुपयेच मिळतील’, ‘दानपेटीत ५०० व हजार रुपयांच्या नोटा टाकू नयेत, देवाचा कोप होईल’, ‘ज्यांना ज्यांना पैसे दिले ते आधी फोन उचलत नव्हते आता स्वत:हून फोन करुन राहिले, शेठ पैसे कुठे आणून देऊ’, ‘मेरे पास गाडी है, बंगला है, बँक बॅलन्स है, तेरे पास क्या है. भाई मेरे पास १००- १०० के नोट है’, ‘बरं झालं मी अगोदरच आटपलं-विजय मल्ल्या’, ‘काहे दिया परदेस’मधल्या निशाची पंचाईत, उशीतल्या ७० लाखांचे काय करायचे’ आणि अशा प्रकारच्या विनोदांचा सोशल मीडियावर पाऊस सुरू होता. यात रामदेव बाबांपासून, महाराष्ट्रातील अनेक राजकारण्यांवर विनोद तयार करुन ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते.