Ahmedabad Plane Crash 2025 : गुजरातमधील अहमदाबाद येथे गुरुवारी मोठा विमान अपघात झाला. अहमदाबादहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमानाला उड्डाणानंतर काही मिनिटांतच हा अपघात झाला. यावेळी विमानात पायलट, क्रू मेंबर्ससह २४२ प्रवासी होते, त्यापैकी २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला असून अन्य २५ जण जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. या मृतांमध्ये खेडा जिल्ह्यातील रुपल पटेल (४५) यांचाही समावेश आहे. त्या वैद्यकीय उपचारांसाठी लंडनहून भारतात आपल्या आईकडे आल्या होत्या. पण, या विमान अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रुपल यांचा भाऊ पवन पटेल अहमदाबाद विमानतळावर तिला निरोप देण्यासाठी आला होता. मात्र, विमानाने टेक ऑफ घेताच काही मिनिटांनी त्यांना या अपघाताची बातमी समजली. ज्यात बहिणीचाही मृत्यू झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसलाय. बहिणीच्या आठवणीने त्यांना दु:ख अनावर झाले आहे. बहिणीबरोबर झालेल्या शेवटच्या संभाषणाविषयी बोलतानाही त्यांना अश्रू दाटून आले. यावेळचा एक भावनिक व्हिडीओ सध्या समोर आला आहे.
पवन पटेल हे बहीण रुपल पटेल यांना अहमदाबाद विमानतळावर सोडण्यासाठी गेले होते. यावेळी बहिणीबरोबर झालेल्या शेवटच्या संभाषणाविषयी त्यांनी सांगितले की, बहिणीला निरोप देण्यापूर्वी विमानतळावर मी तिला मिठी मारली आणि आराम कर, स्वत:ची काळजी घे असे सांगितले.
बहिणीच्या आठवणीत भावाला अश्रू अनावर
मिळालेल्या माहितीनुसार, पवन पटेल हे खेडा जिल्ह्यातील नाडियाद येथील उत्तरसांडा गावचे रहिवासी आहेत. पवन यांनी सांगितले की, विमान अपघातात मृत पावलेली त्यांची बहीण रुपल पटेल १५ वर्षांपासून तिच्या पती आणि तीन मुलांसह लंडनमध्ये राहत होती. ती काही दिवसांपूर्वी वैद्यकीय उपचारांसाठी भारतात आली होती.
पवन पटेल पुढे म्हणाले की, मी बहिणीला लंडनला जाण्यासाठी विमानतळावर सोडण्यासाठी गेलो होतो. ती आजारी असल्याने तिचे सामान उचलून ट्रॉलीत नीट ठेवून दिले. यानंतर तिला मी मिठी मारली आणि लंडनला गेल्यानंतर आराम कर सांगत स्वत:ची काळजी घेण्यास सांगितले. तसेच तू लवकरच बरी होशील काहीच काळजी करू नकोस असा धीर दिला. पण, घरी परतताच मला विमान क्रॅश झाल्याची बातमी मिळाली, जी ऐकून त्यांच्या पायाखालची जमिनीच सरकली.
रुपल पटेल यांच्या वहिनी हीना पटेल यांनाही या क्षणी अश्रू थांबवणं कठीण जात होतं. पण, कसेबसे डोळ्यातील अश्रूंना थांबवत त्यांनी सांगितले की, माझ्या नणंदेचा या अपघातात मृत्यू झाला आहे. त्या लंडनमध्ये राहत होत्या आणि उपचारासाठी भारतात आल्या होत्या. उपचारादरम्यान त्या आमच्याबरोबरच राहत होत्या. उपचारादरम्यान तिचे ऑपरेशनही झाले आणि तब्येत सुधारल्यानंतर त्या आपल्या मुलांकडे आणि पतीकडे जाण्यासाठी उत्सुक होत्या. त्यांना तीन लहान मुलं आहेत, ज्यात एक १३ वर्षांचा मुलगा आणि दोन ७ वर्षांची जुळी मुले आहेत. ते लंडनमध्ये त्यांच्या आईची वाट पाहत होते, परंतु आता कदाचित त्यांना हे समजण्यास वेळ लागेल की, त्यांची आई कधीही परत येणार नाही.
#WATCH | #AhemdabadPlaneCrash | Nadiad, Gujarat | A relative of the AI-171 passenger says, "…My sister had come to Nadiad for treatment. She had a flight today and had to return to London…My sister has been living in London for 15 years and she is staying there with her… pic.twitter.com/jbj2F67fLG
— ANI (@ANI) June 12, 2025
कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, अपघाताची माहिती तिच्या पतीला मिळताच ते ताबडतोब आपल्या तीन मुलांसह गुजरातला रवाना होत आहेत.
मृतांच्या कुटुंबीयांना एक कोटींची भरपाई
अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडियाचे बोईंग ७८७-८ फ्लाइट १७१ हे विमान उड्डाणानंतर लगेचच कोसळले. या अपघातात वैमानिक आणि क्रू मेंबर्ससह २४१ जणांना आपला जीव गमवावा लागला. त्याच वेळी, अपघातानंतर टाटा ग्रुपने अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.