आजच्या जगात माणूसकी हरवत चालली आहे. इथे रस्त्याच्या कडेला पडलेल्या व्यक्तीकडे ढुंकूनही बघायला आपल्याला वेळ नसतो, तिथे इतरांना मदत करणे तर दूरच राहिले. कुठे धर्माच्या नावाखाली निरपराध्यांचे बळी घेतले जातात, तर कुठे विषारी वायू हल्ले करून निरपराध बालकांची हत्या केली जाते. पण या क्रूर जगात काही लोक आहेत जे कोणताही द्वेष, आकस, राग, लोभ, स्वार्थ मनात न ठेवता इतरांची मदत करतात, हैदराबादचे रिक्षाचालक बाबा त्यातलेच एक.
हैदराबादच्या रस्त्यावर बाबा रिक्षा चालवतात. रिक्षा चालवून जे काही पैसे मिळतात त्यात ते समाधानी आहेत. त्यादिवशी त्यांनी एका अनोळखी मुलीला मागचा पुढचा विचार न करता ३ हजार रुपयांची मदत केली. त्यांच्यावर लिहिलेली एक फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. वरीजश्री वेणूगोपाल या महिलेला व्हिसाच्या काही प्रक्रिया पूर्ण करायच्या होत्या. त्यासाठी तिला तातडीने ५ हजारांची गरज होती, पण तिच्याजवळ पैसे कमी असल्याने अडचणी येत होत्या. तिने शहरातल्या दहा एटीएममध्ये जाऊन पैसे काढण्याचा प्रयत्न केला, पण पैसे नसल्याने अनेक एटीएम बंद होते. ऐनवेळी तिला कोणतीही मदत मिळेना तेव्हा याच रिक्षाचालकाने आपल्या खिशातून ३ हजार रुपये काढून तिला दिले. ” मॅडम आप इसे युज करलो और बादमे वापस करलो, कोई बात नही” हे त्याचं बोलणं तिला जास्त भावलं.
वाचा : अंबिकापूरची ‘रिक्षावाली’
समोर असलेल्या व्यक्तीला आपण ओळखतही नाही पण केवळ त्या व्यक्तीला पैशांची त्याक्षणी नितांत गरज आहे हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा कोणताही मागचा पुढचा विचार न करता बाबाने तिला पैसे काढून दिले. अडचणीच्या वेळी देव कोणत्याना कोणत्या रुपात मदतीसाठी धावून येतोच हे तिला त्यावेळी कळलं. त्यादिवशी बाबांच्या रुपात देव तिच्या मदतीला आला होता. बाबामुळेच तिला व्हिसाची प्रक्रिया पूर्ण करता आली. जग बदलत चाललंय. जो तो आपला स्वार्थ बघतोय पण त्यातूनही निस्वार्थीपणे इतरांना मदत करणारे लोक या जगात आहे हे या हैदराबादच्या रिक्षाचालकाने पुन्हा एकदा दाखवून दिले.