ज्ञानेश्वरचा तल्लखपणा पाहून गुरुजींनी त्याच्या वडिलांना शाळेत बोलवून घेतलं. मुलगा हुशार आहे, त्याची अबाळ करू नका, त्याला चांगल्या शाळेत टाका. गुरुजींनी सांगितलं म्हणून परिस्थितीची कसलीही काळजी न करता अशोकराव कदम यांनी ज्ञानेश्वरला लातूरला शाळेत घातलं. सरांचा विश्वास आणि वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करत त्याने दहावीच्या परीक्षेत ९०.६० टक्के गुण मिळवले. मुलाच्या पाठिवर हात ठेऊन गुरुजींनी लढ असे सांगितल्याने आणि वडिलांच्या कष्टाचे चीज करत त्याने हे घवघवीत यश मिळवले.

वाशी तालुक्यातील गोजवडा हे त्याचं गावं. ज्ञानेश्वरच्या घरची परस्थिती बेताचीच. शेतातली कामं करायची आणि त्यावर संसाराचा गाडा हाकायचा. त्यामुळे एकीकडे दैनंदिन गोष्टींसाठी संघर्ष सुरु असताना मुलाचे शिक्षण करणे कदम यांच्यासाठी आव्हानच होते. मात्र मुलाच्या शिक्षणाला पैशांची कमी पडू नये यासाठी बैल-बारधाना घेऊन दुसऱ्याच्या शेतात पाळी-पेरणी करण्याची कामं अशोक कदम करायचे. दुसऱ्याच्या शेतावर अशोकराव गेल्यानंतर त्यांच्या पत्नी शामल घरची सगळी जबाबदारी पार पडायच्या. लातूरच्या शाळेत शिकत असलेल्या ज्ञानाला कोणत्या गोष्टीची कमी पडू नये यासाठी ते दिवस रात्र राबायचे.

तसं अशोकराव आणि शामल कदम या ज्ञानाच्या आई वडिलांना नीट अभ्यास कर हे संगण्यापलीकडे शिक्षणाचं जास्त काही कळत नाही. अशोकराव यांनी शाळेचा उंबराही चढलेला नाही. तर शामल नववी पास आहेत. सातवीपर्यंत ज्ञाना त्यांच्या नजरेखाली शिकला. शाळा संपली की कधी अडी-अडचणीला गुरं राखण्याची जबाबदारी त्याच्यावर असायची. त्याच्या शिक्षकांना त्याच्या गुणवत्तेची आणि परिस्थितीची कल्पना होती. त्यामुळे त्यान शिकावं असं त्यांना वाटत होतं. त्यासाठी त्यांनी वडिलांना दिलेला सल्ला कामी आला. ज्ञानानेही सगळ्यांचा विश्वास सार्थ ठरवत दहावीचा टप्पा उत्तमपणे पार केला आहे. दहावी नंतर त्याला विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन इंजिनियर व्हायचं असल्याचं त्यानं सागितलं.