उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तिथे एका लग्नसमारंभात रसगुल्ला कमी पडल्याने पाहुण्यांचा राग अनावर झाला आणि परिस्थिती इतकी बिघडली की, हाणामारीची घटना घडली. रसगुल्ल्यावरून सुरू झालेल्या वादात सहा जण जखमी झाले, ज्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर हे प्रकरण थेट पोलिसांपर्यंत पोहोचले. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली.

उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील फतेहाबाद तालुक्यातील शमसाबाद भागात ही घटना घडली आहे. रविवारी ब्रिजभान कुशवाह नावाच्या व्यक्तीच्या घरी लग्नसोहळा सुरू होता, या सोहळ्यादरम्यान सर्वकाही व्यवस्थित सुरू होते. त्याचवेळी एका व्यक्तीने रसगुल्ला कमी पडले यावरून काहीतरी टोमणा मारला, जो उपस्थित पाहुण्यांना अजिबात आवडला नाही. यावरून बाचाबाची झाली. यानंतर वाद इतका वाढला की, लग्न समारंभात थेट हाणामारी सुरू झाली. दोन्ही बाजूचे लोक लाथा-बुक्क्यांनी एकमेकांना मारू लागले, ज्यात सहा जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांच्या माहितीनुसार, या मारामारीत ब्रिजभान त्याची पत्नी भगवान देवी, आणि त्यांचा मुलगा योगेश सिंग तसेच मनोज, कैलास, धर्मेंद्र आणि पवन इत्यादींचा समावेश आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणाबाबत तक्रारपत्र आल्यास तपास करून योग्य ती कारवाई केली जाईल.