गुरुवारी (१९ ऑक्टोबर) पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये विश्वचषकाचा रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात 'चेज मास्टर' विराट कोहलीने शानदार शतक झळकावलं. विराटने ९७ चेंडूत १०३ धावांची नाबाद खेळी केली. या शतकाच्या जोरावर भारताने बांगलादेशवर मोठा विजय संपादन केला असून विश्वचषकातील आपली विजयी घौडदौड कायम राखली आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. हा क्रिकेट सामना पाहण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरही स्टेडियममध्ये उपस्थित होती. भारताचा युवा फलंदाज शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. यावेळी स्टेडियममध्ये एक हलका-फुलका क्षण पाहायला मिळाला. या सामन्यादरम्यान, बांगलादेशची फलंदाजी सुरू असताना शुबमन गिल सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. यावेळी प्रेक्षकांनी शुबमन गिलकडे पाहून सारा तेंडुलकरच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली. "हमारी भाभी कैसी हो, सारा भाभी जैसी हो" अशा घोषणा प्रेक्षकांनी दिल्या. याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शुबमन गिल सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना दिसत आहे. तर शेकडो प्रेक्षक सारा तेंडुलकरच्या नावाने घोषणा देत आहेत. पण शुबमन गिल मात्र प्रेक्षकांना प्रतिसाद न देता क्षेत्ररक्षणावर लक्ष केंद्रीत करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून मजेशीर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. भारत-बांगलादेश सामन्यात काय घडलं? बांगलादेशने टीम इंडियासमोर २५७ धावांचे लक्ष्य दिलं होतं. भारताने ४१.३ षटकांत ३ बाद २६१ धावा करत सामना जिंकला. भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा ४० चेंडूत ४८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. शुबमन गिलने पन्नास धावांचा टप्पा पार केला. शुबमन गिल ५५ चेंडूत ५३ धावा करून बाद झाला.यानंतर विराट कोहलीने उर्वरित काम पूर्ण केले. विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. भारताचा माजी कर्णधार ९७ चेंडूत १०३ धावा करून नाबाद परतला. श्रेयस अय्यर अवघ्या १९ धावा करून बाद झाला. याशिवाय केएल राहुल ३४ चेंडूत ३४ धावा करून नाबाद राहिला. हेही वाचा- IND vs BAN: ‘चेज मास्टर’ विराट कोहलीने झळकावले ४८वे शतक, भारताचा बांगलादेशवर ७ गडी राखून दणदणीत विजय बांगलादेशकडून मेहंदी हसन मिराज हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. मेहंदी हसन मिराजने २ विकेट्स घेतल्या. या खेळाडूने शुबमन गिल आणि श्रेयस अय्यरला बाद केले. याशिवाय हसन महमूदला एक विकेट मिळाली. हसन महमूदने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला बाद केले. तत्पूर्वी, तन्जिद हसन (५१), लिटन दासची (६६) अर्धशतकं आणि अखेच्या षटकांमध्ये महमदुल्लाहने (४६) केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर बांगलादेशने निर्धारित ५० षटकांमध्ये ८ बाद २५६ धावांपर्यंत मजल मारली होती. या सामन्यात भारताकडून जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादवने १-१ विकेट घेतली.