Indian Army Soldiers Viral Video : भारतीय लष्कर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे, पण या हल्ल्यांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत आहे. या परिस्थितीत अनेक भारतीय सैनिक देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढण्यासाठी जाताना दिसत आहेत. अशातच उत्तर प्रदेशातील हापूरमधून सैनिकांचा एक हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर आला आहे. हापूरमधील एका ढाब्यावर काही सैनिक जेवणासाठी थांबले होते, यावेळी सैनिकांना पाहताच लोकांनी असे काही केले की पाहून तुमचीही छाती अभिमाने भरून येईल.

लोकांनी उत्साहात केले सैनिकांचे स्वागत

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत सैनिक उत्तर प्रदेशातील बरेलीहून नियंत्रण रेषेकडे जात होते. भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान देशाच्या रक्षणासाठी हे जवान नियंत्रण रेषेकडे जात होते. यावेळी वाटेत ते हापूरमधील एका ढाब्यावर जेवण्यासाठी थांबले. स्थानिकांना सैनिक ढाब्यावर उपस्थित असल्याचे पाहताच खूप आनंद झाला. काही वेळातच तिथे लोकांची मोठी गर्दी जमा झाली, सर्वांनी मिळून सैनिकांचे मनापासून उत्साहाने स्वागत केले. लोकांनी टाळ्या वाजवल्या तर काहींनी फुलांचा वर्षाव केला. यावेळी “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम”च्या घोषणा सर्वत्र गुंजू लागल्या.

हा व्हिडीओ इतका भावनिक होता की पाहून अनेकांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. सैनिकांना इतका आदर, आपलेपणा पाहून आनंद झाला. लोकांनी सैनिकांना प्रोत्साहन दिले आणि म्हणाले, ‘तुम्ही सीमेवर लढत असता म्हणून आम्ही इथे सुरक्षित आहोत.’ याचा अर्थ सैनिकांमुळेच आपल्याला सुरक्षित वाटते. सैनिकांच्या या योगदानाचे ऋण फेडणे कठीण आहे असे लोक म्हणत आहेत.

लोकांनी सैनिकांबद्दल व्यक्त केला आदर अन् प्रेम

लोक सैनिकांबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ देशभक्तीच्या भावनेने भारलेला आहे. यावरून लोक त्यांच्या सैनिकांचा किती आदर करतात हे दिसून येते. या घटनेवरून असे दिसून येते की, देशातील जनताही आपल्या सैनिकांच्या पाठीशी आहे. त्यांच्या संरक्षणाबद्दल आणि त्यागांबद्दल ते नेहमीच कृतज्ञ राहतील. सैनिकांचे अशा प्रकारे स्वागत करणे हा एक अद्भुत अनुभव होता, यामुळे सैनिकांचे मनोबलही वाढले असेल.