देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री हे त्यांच्या साधेपणा आणि कार्यक्षम स्वभावासाठी ओळखले जातात. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती एकाच दिवशी म्हणजे २ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाते. लालबहादूर शास्त्री यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ रोजी मुगलसराय, उत्तर प्रदेश येथे झाला. शास्त्री अवघ्या १६ वर्षांचे होते, तेव्हा त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सामील होण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी आपले शिक्षण अर्ध्यावरच सोडले; शिवाय स्वातंत्र्य चळवळीसाठी ते वयाच्या १७ व्या वर्षी तुरुंगातही गेले.

चीनच्या युद्धानंतर निर्माण झालेल्या अत्यंत बिकट परिस्थितीत लालबहादूर शास्त्रींच्या हाती देशाची सत्ता आली. आपल्या छोट्या कारकिर्दीत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून एक वेगळाच ठसा उमटवला. ‘जय जवान, जय किसान’ हा नारा देऊन जवान आणि शेतकऱ्यांना सन्मान मिळवून दिला. यावरून लालबहादूर शास्त्री यांच्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाचा अंदाज येऊ शकतो. शास्त्री यांच्या विचार आणि निर्भयतेच्या गोष्टी देशासह परदेशांतही लोकप्रिय आहेत. उद्या शास्त्रीजींची जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांचे काही प्रेरणादायी विचार जाणून घेऊ.

हेही वाचा- गांधीजींच्या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या ‘या’ सरकारी योजना माहीत आहेत का? नसेल तर जाणून घ्या….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आवर्जून वाचावेत असे लालबहादूर शास्त्रीजींचे प्रेरणादायी विचार

  • जर मी हुकूमशहा असतो, तर धर्म आणि राष्ट्र वेगवेगळे असते. धर्मासाठी मी जीवही देईन; पण धर्म ही माझी वैयक्तिक बाब आहे. त्याच्याशी राज्याचा काहीही संबंध नाही. राष्ट्रधर्म हा विकास, आरोग्य, दळणवळण, परराष्ट्र संबंध, चलन इत्यादींची काळजी घेईल; परंतु माझ्या किंवा तुमच्या धर्माची नाही. धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे.
  • देशाच्या प्रगतीसाठी आपापसांत भांडण्याऐवजी गरिबी, रोगराई, अज्ञान यांच्याविरोधात लढणे गरजेचे आहे.
  • आम्ही केवळ आमच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी शांती आणि शांततापूर्ण विकासावर विश्वास ठेवतो.
  • आपण राहू अथवा न राहू; हा देश मजबूत राहिला पाहिजे आणि देशाचा तिरंगा फडकत राहिला पाहिजे.
  • जेव्हा स्वातंत्र्य आणि अखंडता धोक्यात असते तेव्हा आपल्या सर्व शक्तींनी आव्हान पेलणे हे एकमेव कर्तव्य असते. आपण सर्वांनी एकत्र यायला हवे आणि आवश्यक त्या त्यागासाठी सज्ज असले पाहिजे.
  • मी दुसर्‍याला सल्ला दिला आणि स्वतः त्याची अंमलबजावणी केली नाही, तर मला अस्वस्थ वाटते.
  • देशाची ताकद आणि सामर्थ्यासाठी सर्वांत महत्त्वाचे कार्य म्हणजे लोकांमध्ये एकता प्रस्थापित करणे.
  • देशाप्रति असलेली निष्ठा ही सर्व निष्ठांच्या आधी येते आणि तीच खरी निष्ठा असते. कारण- कोणीही या बदल्यात आपणाला काय मिळेल याची अपेक्षा ठेवत नाही.